खलनिग्रहणाय: गोष्ट दोन पेरूंची…

0
1
खलनिग्रहणाय:  गोष्ट दोन पेरूंची…


डॉ. भूषणकुमार उपाध्याय40 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

घटनेच्या दुसऱ्या दिवशी ती माऊली दोन पेरू घेऊन ऑफिसला आली आणि ते कापून सगळ्यांना खायला दिले. शबरीच्या प्रेमानं तिनं दिलेल्या या पेरूमुळं आम्हा वर्दीवाल्यांचेही डोळे पाणावले. आता ती हयात नाही. जवळपास ३० वर्षे झाली, तरी ती घटना आजही मनात ताजी आहे. पुढे राष्ट्रपती पदक स्वीकारताना मला जेवढा आनंद झाला, त्यापेक्षा जास्त आनंद ते दोन पेरू बघताना झाला होता…

ही गोष्ट १९९२ ची आहे. नुकतेच ट्रेनिंग संपवून मी पंढरपूरला सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत झालो होतो. त्या काळातील एके दिवशीची सकाळ.. वेळ साधारण ११ ची.. मी कार्यालयात बसलो असताना माझे रीडर पोलिस उपनिरीक्षक साळुंके आले. ‘एक ७० वर्षांची म्हातारी बाई मला भेटायला आलीय, एका गुंडानं तिचं घर बळकावलंय,’ असं त्यांनी सांगितलं. मी तिला आत बोलावून घेतले. खुर्चीवर बसवून प्यायला पाणी – चहा दिला. ती अत्यंत व्यथित झालेली होती. तिनं सांगितलं, ‘पोटापाण्यासाठी मी रस्त्यावर फिरुन पेरू विकते. घरी कुणीही नाही. झोपडपट्टीत राहते. अधूनमधून तब्येत बरी नसते. एक छोटीशी झोपडी होती, ती सुद्धा एका गुंडाने बळकावलीय. आता राहायला जागा नाही. कसे तरी दिवस ढकलतेय. सध्या रस्त्याच्या कडेलाच झोपते. पोलिस स्टेशनला अन् अनेक सरकारी ऑफिसला खेटे मारले; पण काही उपयोग झाला नाही. सगळे लोक सांगतात की, ही दिवाणी बाब आहे, तुम्ही कोर्टात जा. आम्ही काही करू शकत नाही..’

मी स्तब्ध होऊन तिची कहाणी ऐकत होतो. हे सांगतानाही तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. रडत रडतच ती पुढं म्हणाली, ‘साहेब, आम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. माझ्याकडं पैसे नाहीत, त्यातलं काही माहिती नाही. कोर्टात निकालही लवकर लागत नाही. म्हणून शेवटी तुमच्याकडं दाद मागायला आलेय..’ त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझं मन हेलावलं. तिच्याबद्दल खूप सहानुभूती दाटली, त्या गुंडाविषयी प्रचंड राग उफाळून आला. लगेच मी ड्रायव्हरला गाडी लावायला सांगितली. त्या वयोवृद्ध बाईला गाडीत बसवून आम्ही तिच्या घराकडं निघालो. त्या वॉर्डात गेल्यावर तो गाव गुंड चौकात आपल्या गँगसोबत बसलेला दिसला. मी त्यावेळी साधारण २८ वर्षाचा होतो. पहिल्याच पोस्टिंगमुळं अंगात प्रचंड उत्साह होता. नॅशनल पोलिस अकॅडमीत मिळालेलं उच्च दर्जाचं प्रशिक्षण, ज्युडो-कराटेचा रोजचा सराव.. हे सगळं त्यावेळी खूप कामाला आलं. त्या गुंडाला ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई केली आणि मग त्याने स्वतःच कुलूप उघडून त्या बाईला घर परत केलं. तिच्या पाया पडून माफीही मागितली. त्या माउलीला घरी सोडलं आणि ‘पुन्हा काही झालं तर संपर्क करा,’ असं सांगून आम्ही सगळे ऑफिसला परतलो. आपल्यामुळं एक गरीब, असहाय बाईला ताबडतोड न्याय मिळाला, याचा उत्कट आनंद जाणवत होता. दुसऱ्या दिवशई सोलापूरमधील सगळ्या वृत्तपत्रांमध्ये ही बातमी ठळकपणे छापून आली. अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पोलिसांचा सत्कार करण्यासाठी आमच्या ऑफिसला येऊन गेले. आमचा स्टाफही खूप खुश होता.

दुसऱ्या दिवशी ती माऊली दोन पेरू घेऊन ऑफिसला आली आणि ते कापून सगळ्यांना खायला दिले. शबरीच्या प्रेमानं तिनं दिलेल्या या पेरूमुळं आम्हा वर्दीवाल्यांचेही डोळे पाणावले. मी पंढरपुरात होतो तोपर्यंत ती बाई नेहमी ऑफिसला यायची आणि साऱ्यांना आशीर्वाद देऊन जायची. तिथून माझी बदली झाल्यावरही ती बाई पोलिस उपअधीक्षक कार्यालयात येऊन माझ्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांना विचारायची. आता ती हयात नाही. जवळपास ३० वर्षे झाली, तरी ती घटना आजही मनात ताजी आहे. पुढे राष्ट्रपती पदक स्वीकारताना मला जेवढा आनंद झाला, त्यापेक्षा जास्त आनंद ते दोन पेरू बघताना झाला होता…

ही गोष्ट सांगायचं तात्पर्य म्हणजे, आजही खालच्या आणि वरच्या कोर्टांमध्ये लाखो दिवाणी दावे सुरू आहेत. अनेक दशके सरतात, पण या वादांचा निकाल लागत नाही. फिर्यादी कोर्टाच्या पायऱ्या झिजवतात, लाखो रुपयांचा खर्च होतोच; शिवाय प्रचंड असा मानसिक त्रास होतो. एवढे होऊनही वेळेवर न्याय मिळत नाही. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन कारवाई केली आणि दोन्ही बाजूंनी थोडा समजूतदारपणा दाखवला, तर अनेक प्रकरणे चिघळण्याआधीच मिटू शकतात. कारण अशा जमिनीच्या वादांमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेही घडतात. त्यातही खुनाच्या गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे. भाडेकरू घर खाली करत नाही, हा सुद्धा मोठा प्रश्न बनला आहे. सेवानिवृत्तीनंतर स्वत:च्या घरात राहायला मिळेल, या अपेक्षेने पै पै साठवून, प्रसंगी कर्ज घेऊन लोक घर खरेदी करतात. मात्र, अनेकदा भाडेकरू ते खाली करत नाही. मग कोर्टात खटला चालतो. पण, वर्षानुवर्षे निकाल लागत नाही. अशी स्थिती बघून अनेक लोक कायदा हातात घेतात किंवा भाडोत्री गुंडांच्या मदतीने घर खाली करुन घेतात.

एकीकडे घर, जमीन, शेतीच्या वादातून गुन्हे घडतात, तर दुसरीकडे अशा प्रकरणात अनेकदा गुंडांचा हस्तक्षेप होऊन गुन्ह्यांना खतपाणी मिळते. अनेक गुंड आपली दहशत बसवण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी घरे, जमिनी परस्पर खाली करुन घेतात, ती बळकावतात किंवा त्यांची परस्पर विक्री करतात. एकूणच, घर, जमिनीचे वाद दिवाणी दाव्याकडे जाणारे असले, तरी त्यातून अनेक वेळा फौजदारी स्वरुपाचे गंभीर गुन्हे घडतात. पोलिस – प्रशासनाने तर या बाबतीत संवेदनशील आणि तितकेच कर्तव्यकठोर असलेच पाहिजे. शिवाय, अशा गुन्ह्यांना वेळीच पायबंद घालण्यासाठी राजकीय नेते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, माध्यमे यांचीही सतर्कता आणि सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे.

दिवाणी दावे : काय झाले पाहिजे?

– प्रलंबित दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी केंद्र सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखावा.

– चालू दाव्यांच्या गतिमान सुनावण्यांसाठी न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा आवश्यक.

– जमीन, मालमत्तेच्या दाव्यांबाबत नवे, प्रभावी कायदे तातडीने करण्याची गरज.

– अशा सर्व प्रकरणांचा निकाल अपिलासह तीन महिन्यांच्या कालावधीत लागावा.

– वेळेत न्याय मिळण्यासाठी न्यायालयांकडून तीनपेक्षा जास्त स्थगिती दिल्या जाऊ नये

(संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)



Source link