कबीररंग: नैया मोरी नीके नीके चालन लागी…

0
16
कबीररंग:  नैया मोरी नीके नीके चालन लागी…


  • Marathi News
  • Opinion
  • Hemkiran Patki Rasik Article On Kabeer Poem Naiya Mori Nike Nike Chalan Lagi

हेमकिरण पत्की4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कबीरांनी आपल्या दोह्याच्या ओळीओळींत आणि पदाच्या चरणांत अभय आणि शक्ती यांनी भारलेल्या जीवनबोधाच्या खुणा रेखून ठेवल्या आहेत. परमेश्वरप्राप्तीच्या वाटेवरील वाटसरूसाठी या खुणा म्हणजे अनमोल ठेवा आहेत. जन्माला आल्यापासून माणसाचं काळीज काही मूलभूत प्रश्न विचारत असतं. हे प्रश्न म्हणजे : आपण माणूस म्हणून जन्माला आलो, आपण दुबळे आहोत का? देहाचं, मनाचं, बुद्धीचं दुबळेपण आपण दूर करू शकतो का? हे दुबळेपण हटवायला आपल्याला बळाची आवश्यकता भासते का? कोणतं आहे ते बळ? त्याचं स्वरूप काय? ते आपल्या बाहेर आहे की आत? असे अनेक प्रश्न मनाच्या अवकाशात पिंगा घालत असतात.

आपलं मन सतत सुरक्षित राहू इच्छितं. ते एकटं राहत नाही. ते दुसऱ्यात आधार शोधत राहतं. विविध नात्यांच्या माणसांसोबत जगताना दुःखाच्या तावडीत सापडतं. कधी मोहाच्या आकर्षणानं स्वत:ला विसरतं, कधी आसक्तीतल्या भयानं व्याकुळ होतं, तर कधी लाभलेल्या सुखाचा शेवट पाहून शोकात बुडून जातं. अशा या विविध आवर्तांमधल्या आपल्या मनाला बळाचा खरा स्रोत उमजावा म्हणून कबीर देहबळ, मनोबळ, बुद्धिबळ या पलीकडं असलेल्या आत्मबळाच्या दृढतेचं साक्षात् दर्शन घडवतात. एका नितांत बोधसुंदर पदांतून कबीर आत्मबळाची दृढता साधकाच्या प्रत्ययास आणतात. ते पद असं आहे :

नैया मोरी नीके नीके चालन लागी। आंधी मेघा कछु ना व्यापे, चढे संत बढभागी।। उथले रहत डर कछु नाही, नाही गहरे को संसा। उलट जाय तो बाल न बांका, वाह रे अजब तमासा।। औसर लागे तो परबत बोझा, तोउ ना लागे रे भारी। धन सतगुरू जी ने राह बतायी, वाकई रे मैं बलिहारी।। कहे कबीरा जो, बिन सिर खेवे, सो यह सुमति बखाने। या बहु हित की अकथ कथा है, बिरले खेवट ही जाने।। नैया मोरी नीके नीके चालन लागी…

हे पद म्हणजे, ईश्वरावरील अपार भक्तीचं भावचित्र आहे. या चित्रातील ‘मी’ सत्यवाचक, ईश्वरवाचक किंवा अस्तित्ववाचक आहे. कबीरांनी या ‘मी’ला झालेल्या अभय आणि शक्तीचं स्पष्ट दर्शन साधकांना पदांतून घडवलं आहे.

आपण कितीएक वेळा नावेत बसून भरलेल्या नदीतून पैल जाण्यासाठीचा प्रवास करतो. पण, कधी आपल्याला खोल पाण्याचं, कधी अनोळखी नावाड्याच्या वल्हवण्याचं तर नावेत गर्दी करून बसलेल्या प्रवाशांचं भय वाटतं. आपल्याला घेऊन नाव नदीत बुडाली तर काय होईल, या कल्पनेनं आपलं मन भयकातर होतं. एखादा भोळा प्रवासी देवाचं नाव पुटपुटत राहतो. पण, कबीरांच्या या पदातील भक्ताचा नावेतील प्रवास वेगळा आहे. देवे लाभलेल्या जीविताच्या नावेतून भक्त या जन्माची नदी पार करतो आहे. नदीच्या पाण्यातून ही नाव चुबूकss चुबूकss असा आवाज करत, पाणी सहज मागं सारत पुढं निघाली आहे. भक्ताच्या पैलपार जाण्याच्या इच्छेची दिशा आणि गती सद्गुरुंनी सूचित केली आहे. त्यामुळं नदीतून प्रवासताना या नावेला, भरून आलेल्या आभाळाचं आणि वादळाचं भय वाटत नाही. कबीर म्हणताहेत, ही नाव रिकामी नाही, इंद्रियांचं जडपण असलेल्या माणसांनी ओझावलेली नाही, तर नावेत सगळी चेतनेनं भारावलेली संत मंडळी आहेत. म्हणूनच तर नदीचं पाणी उथळ असो वा खोल; भक्ताच्या मनात प्रवास निर्धोक होईल, याविषयी संशय नाही. कुठल्याशा कारणानं नाव पाण्यात उलटली, तरी आपल्या जीवाला कसलाही धोका होणार नाही, ही श्रद्धा भक्ताला आहे.

सद्गुरुंचा शब्द भक्ताच्या हृदयात आहे. तो नुसता सद्गुरुंवरील प्रेमातून हृदयस्थ झालेला नाही तर तो हिताचा आहे, याचा श्रद्धेनं निर्णय झालेला आहे. म्हणून भक्ताच्या या हृद्गतात ‘बहु हित की अकथ कथा है’ असं चरण कबीर योजतात आणि एखादाच आंतरिक दिव्य प्रकृतीला जाणणारा विरळा नावाडी हे श्रद्धासूत्र जाणेल, असं सांगतात.

माणसाच्या आयुष्यात असण्या-नसण्याची आणीबाणी आली की, तो जिथं निर्धारानं, उच्चतम बुद्धीच्या निश्चयानं आपल्या जीविताची नाव नांगरून ठेवतो, तिथं त्या नावेचे नावाडी आपण असत नाही. पैल जायचा निर्णयसुद्धा आपला नसतो. ईश्वरच आपल्या जीविताच्या नावेचा नावाडी असतो. तोच दृष्टीत पैलपार कोरतो. या पदांतून कबीर हेच सूचित करत असावेत, असं वाटतं.

(संपर्क – hemkiranpatki@gmail.com)



Source link