एन. रघुरामन यांचा कॉलम: ज्या प्रेमात प्रदर्शनापेक्षा भावनेला जास्त महत्त्व असते, ते प्रेम अधिक काळ टिकते

0
1
एन. रघुरामन यांचा कॉलम:  ज्या प्रेमात प्रदर्शनापेक्षा भावनेला जास्त महत्त्व असते, ते प्रेम अधिक काळ टिकते




मुंबईतील पवई तलावाच्या काठावरच्या काही संध्याकाळी सहसा शांत असतात. पण त्या संध्याकाळी ती जागा निष्ठेच्या एका खोल उदाहरणाची साक्षीदार बनली. 70 ते 80 वयोगटातील काही निवृत्त व्यक्ती आपल्या रोजच्या गप्पांसाठी तिथे बसल्या होत्या. जसे घड्याळात पाच वाजले तसे त्यातील सर्वात टापटीप कपडे घातलेली एक व्यक्ती उठून उभी राहिली. “अरे मित्रा, थांब ना!’ एकाने आग्रह केला. “आइस्क्रीम पाच मिनिटांत येईल. थोडा वेळ बस, मग जा.’ त्यांनी नकार दिला आणि घरी जाण्यावर ठाम राहिले. पत्नीसोबत संध्याकाळचा चहा घेण्यासाठी. तेव्हाच एका तिसऱ्या मित्राने ज्याच्या आवाजात थोडी कडवट उदासी होती म्हटले, “एवढी घाई काय आहे? त्या तर आता स्मृतिभ्रंशाच्या (डिमेन्शिया) धुक्यात हरवल्या आहेत. त्यांना काहीच आठवत नाही. तू आला आहेस की नाही हे त्यांना कसं कळणार?’ त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले. त्यांची नजर तीक्ष्ण होती आणि आवाजात संध्याकाळच्या हवेलाही थांबवणारी स्थिरता होती. ते म्हणाले, “त्यांना आठवत नाही, पण मला तर डिमेन्शिया झालेला नाही. मला आठवतंय त्या कोण आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासोबत तिथे असणं ही माझी जबाबदारी आहे.’ त्या शब्दांत इतका जडपणा होता की सर्वजण काही क्षणांसाठी शांत झाले. ही प्रेमाची सर्वोच्च व्याख्या आहे. अशी बांधिलकी, जी समोरच्याला समजण्यापलीकडेही टिकून राहते. काही वर्षांपूर्वीच्या या अनुभवाची आठवण मला तेव्हा झाली, जेव्हा शुक्रवारी रात्री एका पार्टी अँकरने मला विचारले की, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही अशी कोणती गोष्ट आहे, जी रोमान्स जिवंत ठेवते? माझे उत्तर साधे होते : लहान, न दिसणारे प्रयत्न तिने मला उदाहरण मागितले. कदाचित तिला एखाद्या भव्य कथेची अपेक्षा होती. पण मी सार्वजनिक स्वच्छतागृहांबद्दल बोललो. मी श्रोत्यांना सांगितले की, माझ्या पत्नीची स्वच्छतेबद्दलची संवेदनशीलता ओळखून मी सार्वजनिक ठिकाणी नेहमी लक्ष ठेवतो. जसे मी एखाद्या हाउसकीपिंग टीमला काम संपवताना पाहतो, मी तिला लगेच सांगतो वॉशरूम आता स्वच्छ आहे, तुला वापरायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. ती अँकर भावुक झाली. तिने पाहुण्यांना सांगितले की, “बघा, हे किती योग्य बोलत आहेत. रोमान्स म्हणजे जगाला दाखवण्यासाठी हार्ट डिझाइनचा चॉकलेट बॉक्स नाही, तर कोणासाठी तरी केलेलं एखादं विचारपूर्वक ‘अदृश्य’ काम आहे.”माझ्यासाठी खरे प्रेम म्हणजे कोणतेही प्रदर्शन नाही. ते तितकेच साधे असू शकते, जितके माझे वडील ऑफिसमधून परतताना एक आण्यात विकत घेतलेला मोगऱ्याचा गजरा आईसाठी आणायचे किंवा रोज ठरावीक वेळी न चुकता चहासाठी हजर राहण्याचा तो शांत निर्णय. कारण हृदय आपले कर्तव्य कधीच विसरत नाही. रोमान्स ही अशी गोष्ट नाही, जिला एखाद्या साच्यात बसवता येईल. मी अशा पतींना ओळखतो, जे स्वयंपाकघरात स्टूलवर बसून कोथिंबीर साफ करतात किंवा भाजी चिरून देतात, जेव्हा त्यांची पत्नी स्वयंपाक करत असते. ते भाजी चिरण्याला साधे घरगुती काम मानत नाहीत; त्या बहाण्याने ते हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात की आपल्या जोडीदाराला भावनिक आणि शारीरिक सुखासाठी काय हवे आहे. ते आयुष्य एकत्र अनुभवतात. दररोज पत्नीसाठी भाजी चिरणे हे खरं तर रोज एकमेकांना ‘डेट’ करण्यासारखेच आहे, जो रोमान्स जिवंत ठेवण्याचा एक मार्ग आहे. संयुक्त कुटुंबात जिथे आई-वडील किंवा ज्येष्ठांच्या देखभालीची जबाबदारी असते अशी जोडपी सकाळी लवकर उठतात आणि स्वयंपाकघरात थोडा वेळ एकत्र घालवतात. कारण नंतर दोघांनाही अनेक भूमिका पार पाडायच्या असतात. मला नाही वाटत की अशी जोडपी आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी कधी महागड्या भेटवस्तूंची देवाणघेवाण करत असतील. ते सामाजिक दबाव, चित्रपट किंवा कादंबऱ्यांमधून निर्माण झालेल्या काल्पनिक रोमान्सचे ओझेही वाहत नाहीत. एक गजरा कदाचित किरकोळ वाटू शकतो, पण विश्वास ठेवा, त्याचा प्रभाव खोल असतो. तो महाग नसतो, पण त्याचा सुगंध बराच काळ टिकतो. ते एकमेकांना हे सांगण्याचे एक साधे माध्यम आहे की ‘मी तुझा विचार करतोय.’ प्रेम कदाचित ‘परफेक्ट’ नसेल, पण ते ‘सुंदर’ नक्कीच असू शकते. फंडा असा की – स्वतःला विचारा अशा कोणत्या लहान-लहान गोष्टी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी अशा प्रकारे करू शकता, ज्याची त्यांना खरोखर गरज होती.



Source link