अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?

0
2


Maharashtra Unseasonal Rain :  राज्यात सध्या अवकाळी पावसानं धउमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरु झाला आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. विशेषत फळ बाग शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. द्राक्ष बागांसह, आंबा, काजू, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, राज्याच्या कोणकोणत्या भागात अवकाळी पाऊस झाला त्याबाबतची माहिती पाहुयात. 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात गारांचा तुफान पाऊस

सांगोला तालुक्यातील जुनोनी जुजारपूर वगैरे परिसरात गेले दोन तासापासून तुफानी गारांचा पाऊस सुरू असल्याने द्राक्ष आंबा आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन तासापासून मेघगर्जनेसह गारांचा अक्षरशः सडा सर्वत्र पडत असून यामुळे शेतातील द्राक्षांचे मणी फुटले आहेत तर डाळिंबाचा मोहोर गळून पडला आहे. त्याशिवाय फळाला आलेल्या केशर आंब्याचे ही मोठे नुकसान झाले असून अनेक कैऱ्या पडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू आणि शेतातून उतरवलेल्या ज्वारीलाही याचा मोठा फटका बसला आहे. आज सायंकाळी बीजाचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यानंतर या गाराच्या पावसाला सुरुवात झाली. दरम्यान डिकसळ येथे एका झाडावर वीज पडून झाड भस्मसात झाल्याची माहिती समोर आली आहे जुनोनी , तिप्पेहळी ,जुजारपूर , करांडेवाडी , गौडवाडी , कोळे , बुद्धेहाळ या सांगोला तालुक्यातील परिसरामध्ये जोरदार गारांचा पाऊस झाला आहे. शेतमालाचे बरेच नुकसान झाल्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गारांचा मोठा पाऊस

सातारा जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून आज संध्याकाळच्या सुमारास फलटण तालुक्यात धुमाळवाडी सह गिरवी भागात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळं काढणीस आलेल्या पिकांसह धुमाळवाडीतील डाळिंब फळा बरोबर आंब्याचा मोहराचे देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारण अर्धा तास पडलेल्या गारपिटीमुळे याचा पिकांवर परिणाम होणार आहे.

अवकाळी पापवासामुळं नाशिक जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान

नाशिक जिल्ह्यातील ताहाराबाद येथे अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली आहे. काढणीला आलेला कांदा व शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सटाणा तालुक्यातील मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. बाजारपेठेतील व्यापारी वर्गाची पावसामुळे झाली धावपळ झाली. 

गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शिरोली महागाव परिसरात आज अचानक वादळी वारा व गारपिटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मका पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील महागाव शिरोली परिसरात अचानक गारपटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळं मका पिकाला फटका बसण्याची शक्यता असून धान पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. अचानक आलेल्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या कडाक्याचे ऊन पडत असतानाच, सोयगाव शहरात निसर्गाचे वेगळेच रुप पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडावली. केवळ पाऊसच नाही, तर सोयगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव झाला आहे. रस्त्यावर आणि घरांच्या छतावर गारांचा पांढरा शुभ्र थर साचलेला पाहायला मिळत होता. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात अशा प्रकारे गारा पडल्याने स्थानिक नागरिकही अवाक झाले आहेत. या गारपिटीमुळे हवेत तात्पुरता गारवा निर्माण झाला असला तरी, हे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

आणखी वाचा



Source link