
अहिल्यानगरः श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे कुट्टी करत असताना यंत्रात हात गेल्याने वैभव सुरेश पवार (३९) तरुण शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
वैभव सुरेश पवार याची पवार वस्तीजवळ शेती व जनावरांचा गोठा आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी कुट्टीचे काम करताना, नजरचुकीने त्यांचा हात यंत्रात अडकला. हात ओढला गेल्याने छातीला जबर मार लागला. हात काढण्यासाठी त्याने प्रयत्न केले; मात्र, मदतीसाठी आसपास कोणीही नसल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शिवम पवार हा तेथून जाताना त्याच्या हा प्रकार लक्षात आला.
त्याने नातेवाइकांना आवाज दिला व वैभवची सुटका करून त्याला उपचारासाठी लोणी येथे हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.वैभवने अनेक नवीन प्रयोग शेतात राबविले. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतीकामात मदत करीत असे. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, बहीण, दोन मुले असा परिवार आहे.