
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील द्वारव्हा तालुक्यातल्या महागाव ते देवगाव या गावांमधील रत्याचं काम पूर्ण करण्यात आलं होतं. त्याचवेळी या मार्गावरील नदीवर मोठा पूल देखील बांधण्यात आला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला, त्यामुळं जून महिन्यातच बांधण्यात आलेला नवाकोरा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळं आता संतप्त महागाव-देवगाव येथील ग्रामस्थांनी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पूल वाहून गेल्याने परिसरातील अनेक पिकांचं देखील नुकसान झालं आहे. त्यामुळं शासनाने तातडीने या प्रकरणाचा पंचनामा करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. पूल वाहून गेल्यानं नागरिकांना लोखंडी पाईपच्या सहाय्याने वाट शोधावी लागत आहे.







