
क्रिकेट वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी झालेल्या गर्दीने एका दिवसात विमानाने प्रवास करण्याचा विक्रम मोडला आहे.
क्रिकेट वर्ल्ड कप (World Cup Final 2023) भारताला जरी नाही मिळाला मात्र, या वर्ल्ड कपमुळे भारतीय एअरलाइन्समात्र मालामाल झाली आहे. वर्ल्ड कपचा अंतीम सामन्याच्या निमित्ताने प्रवाशांनी एका दिवसात विमानाने प्रवास करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. शनिवारी देशभरात सुमारे ४.६ लाख लोकांनी हवाई प्रवास केला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यंदाही दिवाळीत प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण, भारताने वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचल्याने अहमदाबादला पोहोचण्यासाठी लोकांमध्ये उत्साह दिसून आला आणि एक नवा विक्रम रचला गेला. या काळात विमान कंपन्यांनी वाढलेल्या भाड्यातूनही भरपूर कमाई केली.
हे सुद्धा वाचा
सणासुदीच्या काळात वाढवलं भाडं
या सणासुदीच्या काळात एका दिवसात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या कधीही 4 लाखांपर्यंत पोहोचली नाही. यासाठी विमान कंपन्यांना जबाबदार धरले जात होते. वाढत्या मागणीमुळे त्यांनी दिवाळीच्या महिनाभर आधी विमान भाड्यात लक्षणीय वाढ केली होती. एवढ्या जास्त भाड्यामुळे, मोठ्या संख्येने लोकांनी ट्रेनच्या एसी क्लासचे तिकीट काढले. त्यामुळे विमान कंपन्यांची वाट लागली. भाडे वाढवण्याची त्यांची फार पूर्वीची बोली उलटली. पण, विश्वचषक फायनलची २० ते ४० हजार रुपयांची तिकिटेही लोकांनी खरेदी केली.








