चिमणराव कदम यांची पुण्याई सह्याद्री कदम यांच्या विजयाची पायाभरणी ठरणार?

0
11
चिमणराव कदम यांची पुण्याई सह्याद्री कदम यांच्या विजयाची पायाभरणी ठरणार?


फलटण–खंडाळा तालुक्याच्या राजकारणात १९८० ते १९९५ या कालखंडात आमदार म्हणून ठसा उमटवणारे सूर्याजीराव ऊर्फ चिमणरावजी कदम हे नाव आजही जनतेच्या स्मरणात आहे. सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी तालुक्याचे नेतृत्व केले. या काळात रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा, तसेच बजेट इस्टिमेट कमिटीचे अध्यक्षपद भूषवत त्यांनी प्रभावी कामगिरी केली.
आमदार होण्यापूर्वी तब्बल ११ वर्षे पंचायत समिती सभापती, २ वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि २० वर्षे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून काम करत त्यांनी अभ्यासू व कर्तबगार नेतृत्वाची ओळख निर्माण केली. महाराष्ट्र विधानसभेमधील ‘मुलुख मैदान तोफ’ म्हणून ते राज्यभर परिचित होते.
दुष्काळी भागातील शेतकरी, शेतमजूर, दिनदलित व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी कायम आवाज उठवला. नाला बंडिंग, पाझर तलाव, के.टी. बंधारे, गाव तिथे दवाखाना, एसटी सेवा, रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या योजनांसारखी अनेक समाजोपयोगी कामे त्यांच्या कार्यकाळात झाली.
सर्वसामान्य जनतेचा कैवारी म्हणून ओळख निर्माण करताना त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली. आजही फलटण तालुक्यात चिमणरावजी कदम यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते सक्रिय आहेत.
हीच पुण्याई आता त्यांचे सुपुत्र व युवा नेते सह्याद्री भैया कदम यांना कोळकी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवताना लाभदायक ठरणार का, असा प्रश्न जनतेत चर्चेत आहे. मात्र, जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि जनसंपर्क पाहता सह्याद्री कदम यांचा विजयाचा मार्ग सुकर होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, चिमणराव कदम यांच्यानंतर फलटण तालुक्याचे नेतृत्व माजी विधान परिषद सभापती आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्याकडे आले. त्यांनी जलक्रांती, औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून तालुक्याचा चेहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनीही चांगला जनसंपर्क ठेवत लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाचे म्हणजे, चिमणरावजी कदम हयात असताना त्यांनीही कळत-नकळत राजघराण्याच्या राजकारणाला पूरक भूमिका घेतली होती. तालुक्याची सूत्रे सुसंस्कृत घराण्याकडे जावीत आणि तालुका प्रगतीच्या दिशेने जावा, अशीच त्यांची भूमिका होती.
याच भूमिकेचा पुढचा भाग म्हणून राजघराण्याने आज सह्याद्री कदम यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोळकी गटातून सह्याद्री कदम यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.