
वांद्रे रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी, ९ जण जखमी
वांद्रे रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत नऊ जण जखमी झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून रेल्वेने मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधना आणि सुरत स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत तात्काळ लागू आहेत. प्रवाशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने मुंबई ते गोरखपूर या दोन विशेष गाड्या सुरू केल्या. मात्र, वांद्रे चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अपयशी ठरल्याची टीका विरोधक करत आहेत.