
विरेंद्र प्रधान हे मराठी मनोरंजन विश्वातील मोठे नाव आहे. त्यांनी ‘यशोदा’, ‘उंच माझा झोका’ सारख्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘एका छान कलाकृतीची निर्मिती करताना काही निकष, जे आम्ही या क्षेत्रात २५,३० वर्षे काम केल्यानंतर, साधारण १ टक्का समज आल्यावर (हा एक टक्का माझ्या बद्दल आहे) समोर ठेवतो आणि कथा, पटकथा, संवाद, संगीत, काव्य, दिग्दर्शन, फोटोग्राफी, कला वगैरे वगैरेची मांडणी करतो. एक कथा तयार झाल्यावर आणि ती वाहिनीला आवडल्यावर त्यावर पटकथा तयार होत. पटकथा हाच टीव्हीचा आत्मा आहे. असे माझे मत आहे. आता ही पटकथा तयार झाली की, व्यक्तिरेखे नुसार कलाकार निवड होते. व्यक्तिरेखा म्हणजे काय? एखाद्या पात्राचा स्वभाव, रंगरूप, उंची, जाडी, चेहेरा, शारीरीक ठेवण, कपडे वगैरे वगैरे. थोडक्यात त्या व्यक्तिरेखेचे एक स्केच तयार केले जाते आणि मग त्या स्केचला मिळता जुळता चेहेरा, कलाकार म्हणून निवडला जातो. आता हे जे कलाकार आहेत त्याचे ही काही निकष, शास्त्र, अभ्यास असतो. अनुभव हा काम करुनच मिळतो. परंतु, बेसिक शास्त्र आणि प्रशिक्षण जसं इतर कुठल्याही क्षेत्रासाठी असतं, तसंच ते इकडे ही असतं. डॉक्टर, इंजिनिअर किंवा कुठे ही जसे निकष असतात, तसे ते कलाक्षत्रात ही असतात. पाळणे, न पाळणे हा पुन्हा वैयक्तिक चॉइस आहे. मी पाळतो, ९० टक्के तसा प्रयत्न नक्की करतो.’








