
फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या अंतर्गत सोमवार पेठ येथे उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, मुख्याधिकारी निखील जाधव, बांधकाम समितीचे सभापती सोमाशेठ जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ नेते मिलिंद नेवसे, भीमदेव बुरुंगले यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अशा आरोग्यवर्धिनी केंद्रांची आवश्यकता असल्याचे सांगितले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य सेवा मिळाल्यास त्यांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले यांनी प्रभागनिहाय आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. विशेषतः महिलांसाठी तपासणी शिबिरे घेऊन कॅन्सर तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी यांसारख्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सोमवार पेठेत सुरु झालेल्या या केंद्राच्या वरच्या मजल्यावर वाचनालय सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून शहरात लवकरच 50 नवीन स्ट्रीट लॅम्प बसवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
‘500 रुपयांचा खर्च आता शून्य’ — नगराध्यक्ष समशेरसिंह
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, यापूर्वी सोमवार पेठ परिसरातील नागरिकांना साध्या तपासणीसाठी शहरात जावे लागत होते. ओपीडी, औषधे आणि प्रवास खर्च मिळून साधारण 500 रुपये खर्च होत होता. मात्र आता या आरोग्यवर्धिनी केंद्रामुळे नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांची सुविधा मिळणार आहे.
या केंद्रात रक्त तपासणी, लघवी तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच कॅन्सर तपासणीसारख्या विविध चाचण्या उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा — प्रियदर्शिनी भोसले
उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा केंद्रासाठी जागा उपलब्ध नव्हती. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न सुटला असून नागरिकांनी या केंद्राच्या सेवांचा लाभ घ्यावा.
ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांनी सांगितले की, शहरातील दुर्लक्षित भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. रणजितदादा आणि समशेरदादा यांच्या नेतृत्वामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरात चार आरोग्यवर्धिनी केंद्रांची योजना
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. शहरात एकूण चार आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्याची योजना असून जागेअभावी ही योजना अनेक वर्षे प्रलंबित होती. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक सोमाशेठ जाधव आणि नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सेवा आता शहरातील नागरिकांना या आरोग्यवर्धिनी केंद्रातून उपलब्ध होणार असल्याने उपजिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दत्तनगर येथील जुन्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जागेत तिसरे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साखरवाडी गटाच्या आशा गटप्रवर्तक सारिका घार्गे यांनी केले.






