तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये भेसळीचा प्रकार उघड झाल्यानंतर यावरून वाद उफाळला आहे. खास पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या या लाडूंमध्ये जनावरांची चरबी असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याचा प्रयोगशाळेचा अहवालही समोर आला आहे. मात्र या वादानंतरही लाडूच्या विक्रीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. आंध्र प्रदेशमधील तिरुपती तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दररोज ६० हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसात तिरुपतीचे १४ लाख लाडू विकले गेले आहेत. यामध्ये १९ सप्टेंबर ३.५९ लाख, २० सप्टेंबर ३.१७ लाख, २१ सप्टेंबर ३.६७ लाख आणि २२सप्टेंबर रोजी ३.६० लाख लाडूंची विक्री झाली आहे. प्रतिदिन ३.५० लाख सरासरीने लाडूंची विक्री होत आहे.