पुणे प्रतिनिधी :रविवार, १ सप्टेंबर रोजी पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यात टोळीयुद्ध भडकण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु, वनराज आंदेकर यांचे वडील, बंडू आंदेकर यांनी या हिंसक मार्गाला विरोध दर्शवला आहे.
बंडू आंदेकर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “मागील काळात आम्ही गुन्हेगारीच्या मार्गावर होतो, पण आता सगळं सोडून दिलं होतं. जर त्यांना आम्हाला मारायचं होतं, तर त्यांनी माझ्या निरपराध मुलाला का मारलं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या घटनेनंतर न्यायासाठी ते कायदेशीर मार्गच अवलंबणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “आम्ही हत्येचा बदला घेऊ, पण कायद्याच्या चौकटीत राहूनच,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
वनराज यांच्या हत्येनंतर त्यांच्या दोन मुली आणि पत्नी निराधार झाल्या आहेत. बंडू आंदेकरांनी आपल्या कुटुंबासाठी आधार देण्याची जबाबदारी घेतली असून, “मीच जर तुरुंगात गेलो, तर त्यांना आधार कोण देणार?” असा भावनिक प्रश्न त्यांनी विचारला.
बंडू आंदेकरांनी हेही सांगितले की, आपला मुलाचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असला तरी आपण कोणतंही गुन्हेगारी कृत्य करणार नाही, कारण असं केल्यास आपलं कुटुंब उघड्यावर येईल. ते फक्त न्यायाची वाट पाहत आहेत आणि त्यासाठी कायदेशीर मार्गच निवडतील.