
फलटण :- मंदिरात शपथ, पण मनात विश्वास नाही? फलटणमधील शपथनाट्यावर संतप्त प्रतिक्रिया
संविधान, कायदे आणि लोकशाही मूल्यांवर चालणाऱ्या देशात राजकीय विश्वासाची हमी आज देवाच्या दारात शोधावी लागत आहे का? फलटण नगरपालिकेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. स्वीकृत नगरसेवकांनी वेळेत राजीनामा द्यावा, यासाठी थेट सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध काळूबाई मंदिरात नेऊन त्यांच्याकडून शपथ घेतल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शपथ… पण का?
ज्या नगरसेवकांवर पक्षाला विश्वास नाही, त्यांच्याकडून “मी वेळेत राजीनामा देईन” अशी देवासमोर शपथ घ्यावी लागते, हे चित्र लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणे असल्याची भावना व्यक्त होत आहे. राजकीय व्यवहार हे शब्द, लेखी करार, पक्षशिस्त आणि नैतिकतेवर चालायला हवेत. मग पक्षाच्या शब्दाची किंमत इतकी कमी झाली आहे का, की ती मंदिरातील शपथेनेच सुरक्षित करावी लागते?
नगरसेवकांवर पक्षालाच विश्वास नाही का?
या घटनेमुळे सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे – संबंधित पक्षाला स्वतःच्या नगरसेवकांवरच विश्वास नाही का? जर शपथ न घेतल्यास राजीनामा दिला जाणार नाही, अशी भीती पक्ष नेतृत्वाला वाटत असेल, तर हा पक्ष संघटनात्मक अपयशाचा स्वीकार नाही का, असा सवाल जाणकार करत आहेत.
राजकारणात अंधश्रद्धेचा शिरकाव?
आज लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेऊन सत्तेत येतात. मात्र राजकीय सोयीसाठी, दबाव टाकण्यासाठी किंवा बांधिलकी निर्माण करण्यासाठी मंदिरात शपथ घ्यावी लागणे, हा अंधश्रद्धेचा कळस असल्याची टीका होत आहे. राजकीय निर्णय हे कायदे, नियम आणि लोकशाही प्रक्रियेतून व्हायला हवेत; देवाच्या नावावर मानसिक दबाव निर्माण करून नव्हे.
नागरिकांचा संताप अनावर
फलटणमधील नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत तीव्र नाराजी आहे.
“ज्या पक्षाला स्वतःच्या नगरसेवकांवर विश्वास नाही, तो पक्ष शहराचा कारभार प्रामाणिकपणे कसा चालवणार?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
काही नागरिकांनी तर “हे शपथनाट्य म्हणजे राजकीय अपयशाची कबुली आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्या शपथ मोडली तर जबाबदारी कोणाची?
देवाच्या नावावर घेतलेली शपथ जर पाळली गेली नाही, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पक्ष, नगरसेवक की देव? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. देवाच्या नावावर राजकारण करून देवाचा आणि लोकशाहीचा एकाच वेळी अपमान केला जात नाही ना, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
फलटणमधील हा शपथनाट्याचा प्रकार केवळ एका नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता, राज्यातील राजकीय नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.







