सोलापूरसह भीमा नदीकाठच्या शहरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या दोन आकस्मिक आरक्षणास मंजुरी
सोलापूर | 30 जानेवारी 2025 – सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तसेच भीमा नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत 5.50 टीएमसीचे दुसरे आणि 6.50 टीएमसीचे तिसरे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजुरी दिली. या बैठकीत त्यांनी नागरिकांना पाण्याचा सुयोग्य वापर करण्याचे आवाहनही केले.
जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठक नियोजन भवन समितीच्या सभागृहात पार पडली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एस. खांडेकर, कार्यकारी अभियंता धीरज साळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपअभियंता कैलास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
जलसंपदा विभागाला योग्य नियोजन करण्याचे निर्देश
बैठकीत जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये यासाठी जलसंपदा विभागाने उजनी धरण प्रकल्पातील पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. विविध पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याचे आकस्मिक आरक्षण करून नियोजित वेळेनुसार भीमा व सीना नद्यांमध्ये पाणी सोडण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
उजनी धरणातील सध्याचा पाणीसाठा
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. खांडेकर यांनी उजनी धरणातील सध्याच्या पाणीसाठ्याची माहिती दिली. 29 जानेवारी 2025 रोजी उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा 40.59 टीएमसी असून, अचल पाणीसाठा 63.66 टीएमसी आहे. एकूण धरण साठा 104.25 टीएमसी इतका आहे. यापूर्वीही या भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी सहा टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.
पाणी सोडण्यास विलंब का झाला?
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे आवश्यक होते. मात्र, पालकमंत्री यांच्या नियुक्तीचा विलंब झाल्यामुळे जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीची बैठक घेता आली नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्र्यांची मान्यता घेऊन पहिल्या आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. आता समितीच्या मंजुरीनुसार दुसरे आणि तिसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे, असे श्री. खांडेकर यांनी स्पष्ट केले.
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
बैठकीत पाणी बचतीवर भर देण्यात आला. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर करून बचत करावी, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.