साहस Times | मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि मराठा साम्राज्याच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले महाराष्ट्रातील 12 किल्ले अखेर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या यादीत रायगड, प्रतापगड, राजगड, पन्हाळा, शिवनेरी अशा ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश असून, तामिळनाडूतील जिंजी किल्लाही या यादीत स्थान पटकावतो.
युनेस्कोच्या यादीत समावेश झालेल्या किल्ल्यांमध्ये सतराव्या शतकातील मराठा लष्करी स्थापत्य, अभेद्य तटबंदी आणि ऐतिहासिक महत्त्वाचा ठसा उमटलेला आहे. भारत सरकारने 2023 मध्ये यासाठी युनेस्कोसमोर प्रस्ताव मांडला होता आणि आता तो मान्य झाला आहे.
जागतिक वारसा यादीतील 12 किल्ले पुढीलप्रमाणे :
- रायगड
- राजगड
- प्रतापगड
- पन्हाळा
- शिवनेरी
- लोहगड
- साल्हेर
- सिंधुदुर्ग
- विजयदुर्ग
- सुवर्णदुर्ग
- खांदेरी
- जिंजी (तामिळनाडू)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे हे ऐतिहासिक दुर्ग जागतिक स्तरावर सन्मानित होणे हे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण आहे.” या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष योगदान असून, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार यांचेही सहकार्य लाभले, असेही त्यांनी नमूद केले.
भारतामध्ये युनेस्कोच्या यादीतील वारसा स्थळांची संख्या आता 42 वर पोहोचली आहे. यामध्ये आधीच अजिंठा, वेरूळ, एलिफंटा लेणी, मुंबईचा व्हिक्टोरियन आर्ट डेको परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांचा समावेश आहे.