
फलटण :- सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर ठेवणार का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा आकडा राष्ट्रवादी–शिवसेनेकडे झुकत असल्याने सत्तास्थापनेत नवे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभेनंतर जिल्ह्यात बदललेले राजकीय चित्र
सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि शिवसेनेचे २ आमदार निवडून आले होते. त्यानंतर सत्तास्थापनेदरम्यान भाजपने जिल्ह्याला दोन मंत्रिपदे देत साताऱ्याला विशेष महत्त्व दिले. त्यामुळे सातारा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्षांमध्येच संघर्षाची स्थिती निर्माण झाली. नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर लढत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले.
मंत्र्यांमधील संघर्षामुळे वाढली राजकीय दरी
ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सक्रिय राजकारण करत त्यांना आव्हान दिले. तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली.
वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवत मंत्री मकरंद पाटील यांना राजकीय शह दिला. त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही एकमेकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले.
जिल्हा परिषदेत बहुमताचे गणित
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप २७ जागांवर विजयी होत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सत्तेसाठी स्पष्ट बहुमत आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २० तर शिवसेनेने १५ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास बहुमताचा आकडा सहज गाठता येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी–शिवसेना युतीची शक्यता बळावली आहे.
‘चहा पे चर्चा’ ठरली निर्णायक?
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थानी झालेली बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरविण्याच्या हालचाली करत आहेत.
भाजपसमोर मोठे आव्हान
भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी स्पष्ट बहुमत नसल्याने मित्रपक्षांची साथ आवश्यक आहे. मात्र सध्याच्या राजकीय हालचाली पाहता राष्ट्रवादी–शिवसेना आघाडीने पुढाकार घेतल्यास भाजपला सत्तेबाहेर बसावे लागू शकते.
साताऱ्यातील या नव्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. आता अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








