हक्काच्या पाण्यासाठी रणसंग्राम! – संजीवराजेंचा इशारा; “फलटणचा हक्क हिरावू देणार नाही”

0
2
हक्काच्या पाण्यासाठी रणसंग्राम! – संजीवराजेंचा इशारा; “फलटणचा हक्क हिरावू देणार नाही”

फलटण (सासवड) :“नीरा-देवघर धरणातून वाचणाऱ्या पाण्यावर फलटण-खंडाळ्याचा हक्क प्रस्थापित आहे, हे पाणी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न झाला, तर तीव्र संघर्ष छेडू,” असा ठाम इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. सासवड (ता. फलटण) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

“गवगवा करणाऱ्यांनी पाणी भलत्याच दिशेने वळवलं”

संजीवराजेंनी माजी खासदारांवर निशाणा साधत म्हटलं की, “जे पाणी फलटण-खंडाळ्यासाठी वाचलं होतं, त्याचा गवगवा करत ते सांगोला-पंढरपूरकडे वळवण्याचा प्रयत्न झाला, आणि आता तर ते तिसऱ्याच दिशेने वळवलं जात आहे. हे खपवून घेणार नाही. हे पाणी आमचं आहे आणि ते आमच्याकडेच राहिलं पाहिजे.”

“पाण्यावर हक्क प्रस्थापित करणार्‍यांचा संघर्ष विसरू नका”

“आ. रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी मोठा लढा दिला. कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली, तेव्हा माजी खासदार शिक्षण घेत होते. त्यांचं पाणी आणल्याचं दावं हास्यास्पद आहे,” असा टोला संजीवराजेंनी लगावला.

“नव्या नेतृत्वाचा उदय; जुन्या राजकारणाला रामराम”

संजीवराजेंनी पुढे स्पष्ट केलं की, “राजकारणात जे मोठं झालं ते आता स्वतःच्या फायद्यासाठी पळून गेलेत. आता नवे दमाचे नेतृत्व उभे करून, तालुक्याला सुसंस्कृत राजकारण देण्याची वेळ आली आहे. खचून न जाता कामाला लागा.”

इतर प्रमुख उपस्थितांचे मत :

  • माजी आमदार दीपक चव्हाण – “रामराजेंच्या मार्गदर्शनामुळे शैक्षणिक, हरित आणि औद्योगिक क्रांती झाली. पुढच्या सर्व निवडणुका ताकतीने लढू.”
  • जिल्हा परिषद माजी सदस्य दत्ता अनपट – “1995 मध्ये रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी सरकारला पाठिंबा दिला. फलटणमध्येच मुख्यमंत्री मनोहर जोशींनी कृष्णा खोरे महामंडळाची घोषणा केली होती.”

संपूर्ण कार्यक्रमात राजकीय धुराळा उडवत संजीवराजेंनी स्पष्ट संदेश दिला – पाण्याच्या हक्कावर कोणतीही तडजोड मान्य नाही!