
‘रावरंभा’ या चित्रपटाने मला खूप काही दिलं. अभिनेता म्हणून घडवणाऱ्या चित्रपटांपैकी एक हा चित्रपट होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याबद्दल मला खूप श्रध्दा असल्याने या चित्रपटात काम मिळाल्यानंतर ओम भूतकर म्हणून छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेता आल्या. मला माझ्या पात्राशी प्रामाणिक राहायचं आहे. आपल्याला त्या इतिहासाच्या चौकटीत राहायचं आहे, संवाद अर्थपूर्ण म्हणायचे आहेत, हे मी सतत सेटवर स्वतःला सांगायचो. या चित्रपटाशी मी मनाने जोडला गेलो आहे. तो काळ माझ्यासमोर उभा राहायचा. त्यातून भारावून जायला व्हायचे. इतकंच नव्हे तर माझ्या डोळ्यांत अनेकदा पाणी आलेय की, शिवरायांच्या काळात जीवाला जीव देणारी माणसे होती. निष्ठेसाठी प्राण देण्याची तयारी असलेली माणसे होती. कुठून येत असेल ही त्यागाची भावना? हा विचार करून मी अनेकदा सेटवर रडलो होतो. ‘रावरंभा’ हा सिनेमा म्हणजे शिवकाळातील एक साहसी पान आहे आणि त्या पानावर अभिनेता म्हणून माझं छोटंसं नाव कोरलं याचा खूप अभिमान आहे’, असं सांगताना आजही ओमच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.








