
पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत.
इस्लामाबाद : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. परिस्थिती इतकी भीषण आहे की, सरकारने बलुचिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. या पावसामुळे देशातील विविध भागात आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी खैबर पख्तूनख्वामध्ये सोमवारी 12 जणांचा मृत्यू झाला.
याशिवाय पंजाबमध्ये 4 आणि बलुचिस्तानमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानच्या मकरानमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी वीज पडली. या घटनांमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बलुचिस्तानमधील मृतांची संख्या 10 झाली आहे. बलुचिस्तान सरकारने शहरी पूर आणीबाणी घोषित केली आहे. या पावसामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही परिस्थिती बिकट झाली आहे.









