
पुण्यात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. याचा सर्वाधिक फटका हा सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना बसला होता. या ठिकाणी अनेक घरे आणि सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. पाण्यासह घाण, माती, गाळ या परिसरात साचला होता. तर पाण्याच्या टाक्यांमध्येही घाण साचली होती. तर नळाला येणारे पाणी देखील अशुद्ध, गढूळ होते. त्यामुळे या भागात प्रामुख्याने जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व पाणी प्रामुख्याने उकळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दूषित पाणी प्यायल्याने पसरणाऱ्या जलजन्य आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे. दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, टायफॉईड ताप, हिपॅटायटीस यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी किंवा मनपा आरोग्य केंद्रांना सतर्क करा, असे आवाहन मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी केले आहे.




