
पाणीपुरवठा विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार ३ हजार २९ गावे व ७ हजार ७३८ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार ६१६ खासगी व ९६ शासकीय टँकर असे एकूण ३ हजार ७१३ टँकर तैनात करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या मराठवाडा विभागात सर्वाधिक टँकर असून, १२७३ गावे व ५०७ वाड्यांना १ हजार ८६६ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्याखालोखाल नाशिक विभागात ७७२ गावे व २ हजार ५८० वाड्यांना ८२३ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. नागपूर विभागाने ११ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ सात टँकर सुरू केले आहेत. कोकण विभागात २५१ गावे व ८१८ वाड्यावस्त्यांना १६७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.