
एनडीए सरकारचा भाग असलेले टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहून त्यांनी थेट भाजपलाच संदेश दिला की, सर्व काही ठीक चाललेले नाही.
पाटणा : सध्या तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidue) आणि संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या पाठिंब्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी त्यांचा प्रमुख मित्रपक्ष भाजपला पहिला मोठा धक्का दिल्याचे मानले जाते. चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहून त्यांनी थेट भाजपलाच संदेश दिल्याचे सांगण्यात येते.
नितीश कुमार शपथविधी सोहळ्यापासून दूर राहिल्याने ते भाजपच्या मनमानी कारभारावर नाराज असल्याच्या अटकळांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. एनडीएमध्ये वातावरण बिघडू लागल्याचा विरोधकांचा दावा आहे. मंत्रिमंडळ विभाजनावर नितीश खूश नाहीत. भाजपने त्यांना केवळ एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिले आहे. त्यातही पंचायत राजसारखे द्वितीय श्रेणी खाते मिळाल्याने नितीश नाराज असल्याचे म्हटले जात आहे.









