
जुहू, कोळीवाड्यात पाणीटंचाई, ६ दिवसांपासून नागरिक पाण्याविना
अंधेरी पश्चिमेकडील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने गेल्या आठवड्यात जुन्या पाण्याचे पाईप बदलले असले तरी जुहू कोळीवाडा, मांगलेवाडी, जुहू तारा, इंद्रनगर परिसरातील १०० हून अधिक घरांतील नळ सहा दिवसांपासून कोरडे पडले आहेत. अनेक कुटुंबांना पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही, तर काही कुटुंबांना १० मिनिटे पाणीपुरवठा झाला. या परिस्थितीमुळे रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. काहींनी बाटलीबंद पाणी, टँकरचे पाणी विकत घेतले आहे, तर काहींनी बोअरवेलचे पाणी विकत घेतले आहे.





