
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यापासून महाविकास आघाडी व महायुतीत जागावाटप प्रक्रियेला वेग आला आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी २६० जागांवर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये परस्पर सहमती झाली असली तरी २८ जागांवर घटक पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे. या जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यात संघर्ष सुरू आहे. काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांनी शिवसेनेवर जागावाटपात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे, तर शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यामुळे ते थेट राहुल गांधींशी बोलतील, असे म्हटले आहे.