
Mumbai crime news : स्वप्ना नगरी म्हटल्या जाणार्या मुंबईत अनेक जण विविध स्वप्न घेऊन येत असतात. मुंबईतील धकाधकीच्या आणि गर्दीने भरलेल्या जीवनात अनेक जण तणावाखाली काम करत असतात. हा ताण तणाव मुंबईचा दैनंदिन भाग असला तरी, याच तणावातून अनेक जण टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मुंबईत रोज चार नागरीक आपले जीवन संपवत असल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. संपूर्ण देशातील शहरांमध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईत २०२२ मध्ये १५०१ आत्महत्येच्या घटनांची नोंद झाली होती, तर २०२१ मध्ये १४३६ घटनांची नोंद झाली होती. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये यात ४.५ टक्याने वाढ झाली असून, ही चिंतेची बाब आहे.




