Maharashtra Politics News | महाराष्ट्रातील दोन ‘अँग्री यंग मॅन’ एकत्र येणार | पुढारी

0
20


सातारा, हरीष पाटणे : महाराष्ट्राच्या राजकारणात आकस्मिक झालेल्या अभूतपूर्व सत्तानाट्याने भविष्यकाळात बरेच उलटफेर पाहायला मिळणार आहेत. राज्यातील हेविवेट व राजकारणातील अँग्री यंग मॅन म्हणून ओळखले जाणारे दोन बलाढ्य नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज, भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना सत्तेच्या सारीपाटाने एकत्र आणले आहे. यापूर्वीचा दोघांच्या तलवारींचा खणखणाट आता देवेंद्र फडणवीसांमुळे म्यानबंद होणार आहे. तर दोघांची आँख मिचौली महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Politics News)

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सातारा जिल्ह्याने सर्वाधिक प्रेम केले ते ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्यावर. सातारा जिल्ह्याचे जेवढे प्रेम शरद पवारांवर, तेवढेच प्रेम छत्रपती घराण्यावरही. राजघराण्यातील कोणत्याही व्यक्तीबाबत सातारा जिल्हावासीयांमध्ये आदराची व आपुलकीची भावना आहे. त्यामुळेच उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे यांना जिल्ह्यात नेहमीच मानसन्मान मिळत गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप दिले. शरद पवारांनी जेव्हा सातार्‍याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे सूत्रे दिली. तेव्हा 11 ही तालुक्यांमध्ये अजितदादांचे स्नेहसंबंध प्रस्थापित झाले.

कामाचा झपाटा, विकासकामे करण्याची जिद्द, कार्यकर्त्यांना दिलेली आपुलकीची वागणूक यामुळे तरुणांमध्ये अजितदादांची क्रेझ वाढत होती. याच कालावधीत 2002 साली झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. मग काँग्रेसला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी अजितदादांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला सोबत घेतले. तेव्हा सातारा विकास आघाडीच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. त्याकाळी तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या अजितदादा व उदयनराजेंची मैत्री सर्वदूर पसरली. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या; तर उदयनराजेंचे उजवे हात सुनील काटकर हे जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती झाले.

प्रदीर्घ काळ अजितदादा व उदयनराजेंचा मैत्रीचा पैरा जिल्ह्यात सुरू होता. मात्र, नंतरच्या कालवधीत दोघांमध्ये अनेक कारणांवरून मतभेद सुरू झाले. मतभेदाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणांमध्येही झाले. कधी ही भांडणे रस्त्यात तर कधी विश्रामगृहावरही झाली. दोघांमध्ये अनेक काळ शाब्दिक वारही रंगले. अजितदादांनी उदयनराजेंवर तर उदयनराजेंनी अजितदादांवर कडवट टीका केली. त्यामुळे जिगरी दोस्तीचे रूपांतर जानी दुश्मनीत झाले. कित्येक काळ ही मतभेदाची दरी वाढलेलीच होती. उदयनराजे राष्ट्रवादीत आल्यानंतर लोकसभेचे खासदार झालेल्या 10 वर्षांत अजितदादा व उदयनराजेंचे फारसे सख्य नव्हते.

मात्र, पक्षीय चौकटीत एकत्रित असल्यामुळे दोघांना एकमेकांसोबत रहावे लागत होते. त्या काळात ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी दोघांची अवस्था होती. मात्र, संबंधांमध्ये पूर्वीसारखी कटूता नव्हती. अलिकडच्या काळात मात्र अजितदादा व उदयनराजे जेव्हा भेटायचे तेव्हा वेगवेगळ्या पक्षात असूनही त्यांच्यामध्ये हास्य-विनोद रंगायचे. ‘काय राजे कसं काय बर हायं का?’ असा अजितदादांचा तर ‘फिट्ट अँड फाईन’ असा उदयनराजेंचा डायलॉग रंगायचा. त्यामुळे अजितदादा व उदयनराजेंमध्ये असलेले मतभेद संपुष्टात आल्याची पार्श्वभूमी तयार झाली.

आता राज्यात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडींनंतर अनेक उलटफेरांना सुरूवात झाली आहे. उदयनराजे हे राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जीवलग मित्र म्हणून ओळखले जातात. तर तशीच मैत्री देवेंद्र फडणवीसांची अजितदादांबरोबरही आहे. शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेवून भाजपबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी उदयनराजेंनी मुंबईत जावून देवेंद्र फडणवीस यांना तलवार व वाघनखे भेट दिली.

शरद पवारांच्या पावसातील सभेमुळे पराभव झालेल्या उदयनराजेंना पवारांची राष्ट्रवादी फडणवीसांनी फोडल्यानंतर झालेला हा आनंद होता. त्याचवेळी उदयनराजेंनी अजितदादांच्या भूमिकेचीही पाठराखण केली. उदयनराजे हे भाजपचे नेते आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत. तर अजितदादा आता भाजपच्या सोबत आहेत. वर्षभरावर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अजितदादांनी तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाषणांमध्ये जागा वाटप कसे असेल हेही सांगून टाकले आहे. त्यामुळे भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी निवडणुकांमध्येही एकत्र राहणार असेच सध्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातले अजितदादा व उदयनराजे हे दोन्ही ‘अँग्री यंग मॅन’ भविष्यकाळात एकाच व्यासपीठावर प्रचार करताना दिसणार आहेत.

अजितदादांच्या सातारा दौर्‍यातही उदयनराजेंची भेट आता होत राहणार आहे. तर उदयनराजेंच्या मुंबईतल्या भेटीत तेही अजितदादांना भेटत राहणार. त्यामुळे दोन ध्रुवावरचे हे दोघेजण भविष्यकाळात एकत्र दिसले तर नवल वाटायला नको. दोघांमधली ही आँख मिचौली भविष्यकाळात राज्याच्या राजकारणात उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. दोन तलवारींनी यापूर्वी बराच खणखणाट केला आहे. या दोन्ही तलवारी फडणवीसांनी आता म्यानबंद केल्याने जुन्या दोस्तीचा नवा पैरा पुन्हा एकदा पहायला मिळेल.
दोघांच्या वादात शरद पवारांची चुप्पी होती!

अजितदादा पवार व उदयनराजे भोसले यांच्यातला वाद राज्यभर गाजला होता. ज्या अजितदादांशी उदयनराजेंनी पंगा घेतला होता, त्याच उदयनराजेंना लक्ष्मणराव पाटील यांचे तिकीट डावलून शरद पवार यांनी तिकीट दिले होते. उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे फारसे सख्य नव्हतेच. अजितदादा व उदयनराजेंच्या मतभेदाच्या काळात शरद पवार यांनी कधीच कुणाची बाजू घेतली नव्हती. दोघांच्या वादात त्यांची कायम चुप्पी असायची. ती का असायची… याचे संदर्भ आता अनेक जण आठवत आहेत. (Maharashtra Politics News)



Source link