
गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीने महाराष्ट्रात तब्बल दीड किलोमीटर घुसखोरी करून बेकायदा पथदिवे लावले आहेत. याला महाराष्ट्रातील वेवजी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. दोन राज्यांतील सीमा सुस्पष्ट व्हावी, त्यामध्ये सुसूत्रता यावी, दोन राज्यांच्या सीमेवर नागरिकांना विनातक्रार प्रवास करता यावा, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आदानप्रदान व्हावे या साठी हा मुद्दा लवकरात लवकर सोडवण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे. राज्याच्या निर्मितीपासून पालघर जिल्ह्यातील तलासरीत वसलेल्या काही भांगात महाराष्ट्र-गुजरात राज्याचं अद्याप योग्य पद्धतीनं सीमा ठरली नसल्याने हा सीमावाद आता पुढे येऊ लागला आहे. येथील सीमेलगतच्या वेवजी, तलासरी, गिरगाव, गिमाणिया, झाई, आच्छाड, संभा तर गुजरात राज्यातील सोलसुंबा, उंबरगाव येथील नागरिकांमध्ये सुसंवाद व व्यवहारात अडथळा निर्माण होत आहे.






