loksatta editorial on Maharashtra ssc board 10th result अग्रलेख : गुण आणि गुणवत्ता

0
8
loksatta editorial on Maharashtra ssc board 10th result अग्रलेख : गुण आणि गुणवत्ता


दहावीचे गुण आणि त्याची वैयक्तिक/ कौटुंबिक स्तरावर होणारी कौतुकभरली चर्चा यांना केवळ ‘बेस्ट फाइव्ह’ आणि ‘अंतर्गत गुणांकना’चा आधार असून कसे चालेल?

दहावीचा निकाल नेहमीप्रमाणे लागला. म्हणजे, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, जे दहावीची परीक्षा घेते, त्यांनी या निकालाची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगितली असली, तरी गेल्या साधारण दशकभराचा विचार करता, निकालात फार काही वेगळे दिसते आहे असे नाही. तशी बारावीप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा निकालात १.७१ टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे; पण दहावीच्या निकालातील ही वाढ-घट गेली चार-पाच वर्षे माफक प्रमाणात वर-खाली होतच राहिली आहे. शिवाय, यंदा निकालाची टक्केवारी घटण्याचे एक कारण राज्य मंडळाने बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेच्या वेळी राबविलेले कॉपीमुक्त अभियान हेही आहेच. ते स्वागतार्ह; कारण कॉपी न होणे हा हेतू असलाच पाहिजे. निकाल असा ‘नेहमीप्रमाणे’ लागला असेल, तर त्यावर भाष्य का, असा प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर प्रश्नातच आहे. कारण, निकाल ‘नेहमीप्रमाणे’ लागणे यात दहावीतून पुढे अकरावीत जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या निकालातून त्यांच्या क्षमतांचा निश्चित अंदाज देता न येणे हे पुन:पुन्हा होते आहे. आधी यंदाच्या निकालातील काही महत्त्वाच्या आकडेवारीबद्दल आणि नंतर ही आकडेवारी आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता यांचा घातला जात नसलेला मेळ याबद्दल. तर, आकडेवारी सांगते आहे, की यंदा २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले ८१ हजार ८०९, ८५ ते ९० टक्के मिळालेले १ लाख ११ हजार ८७८, ८० ते ८५ टक्के मिळालेले १ लाख ३९ हजार आणि ७५ ते ८० टक्के गुण मिळालेले १ लाख ५६ हजार ३७५ विद्यार्थी आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचे सर्वांत आधी अभिनंदनच. कुणी काहीही म्हणो, आपल्याकडे अजूनही ‘दहावीला किती गुण मिळाले,’ या प्रश्नाच्या उत्तराला वलय आहेच. ‘आधी’च्या पिढीसाठी गुणांचा हा फुगवटा डोळे दिपवणारा, पण त्याच जोडीने अभिमानाने ऊर भरून जाणाराही असतोच. गेल्या साधारण दशकभराच्या काळात हे दिपलेले डोळे वाढले, कारण ‘भरघोस’ गुण मिळवणारेही वाढले. या सगळ्यांचे पुढे काय होते, हा कळीचा प्रश्न आणि म्हणूनच गेल्या साधारण दशकभरापासून निकालाचे हे वैशिष्ट्य जाणवत असले, तरी त्यावर भाष्य आवश्यक. ते दर वर्षीही आवश्यक; कारण या चक्रात आलेला दहावीचा विद्यार्थी आणि त्याचे पालक दर वर्षी नवीन असतात.

‘भरघोस’ गुण मिळण्याचे एक सरळसरळ कारण आहे ‘बेस्ट फाइव्ह’ पद्धत. एकूण विषयांतील पाच सर्वोत्तम गुण मिळालेल्या विषयांची टक्केवारी ही दहावीची अंतिम टक्केवारी म्हणून गणली जाऊ लागली, तेव्हा साहजिकच ‘भरघोस’ गुण मिळविणाऱ्यांची संख्या वाढली. ही ‘बेस्ट फाइव्ह’ पद्धत आणण्याचे एक कारण होते, ते म्हणजे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशावेळी आघाडीच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांशी होत असलेली स्पर्धा. प्रवेशावेळी गुणांचे समानीकरण करूनही, इतर मंडळांचे विद्यार्थी ‘बेस्ट फाइव्ह’मुळे पुढे जातात, म्हणून राज्य मंडळानेही ‘बेस्ट फाइव्ह’चे तत्त्व आणले. अर्थात, त्यानंतर नजीकच्या भूतकाळात या केंद्रीय शिक्षण मंडळांनी त्यांच्या एकूणच परीक्षा पद्धतींत, प्रश्नांत, मूल्यमापनांत केलेले बदल आपण अजूनही आत्मसात करू शकलेलो नाही, हा भाग अलाहिदा. पण, आपल्याला जे टप्प्याटप्प्याने ‘सीबीएसई’च्या धर्तीवर अभ्यासक्रम, वेळापत्रक असे सगळेच आणायचे आहे, त्यात हा सगळा भाग येईल, अशी किमान आशा करू! यंदाच्या निकालापुरते बोलायचे, तर मात्र त्यातील ‘भरघोस’ गुणांत गेल्या काही वर्षांप्रमाणेच ‘बेस्ट फाइव्ह’चा मोठा हात आहे, हे वास्तव.

‘बेस्ट फाइव्ह’ला आणखी एक जोड आहे ती अंतर्गत गुणांची. दहावीच्या विषयांच्या प्रात्यक्षिक/तोंडी परीक्षांचे २० गुण शालेय स्तरावर दिले जात असल्याने ते शक्यतो ‘पैकीच्या पैकी’ असतील, याची ‘काळजी’ अलीकडे प्रत्येक शाळा घेते. शेवटी, शाळेलाही १०० टक्के निकाल लावायचा असतो! या अंतर्गत गुणांचाही ‘भरघोस’ गुणांत मोठा वाटा आहे. इतकेच नाही, तर कला, क्रीडा, एनसीसी, स्काउट, गाइड यात सहभागी होणाऱ्यांना या सहभागासाठी अतिरिक्त गुण मिळतात. ‘सवलती’चे म्हणून मिळणारे हे गुणही, गुण फुगवट्यात भर घालणारे. यंदा २ लाख ४६ हजार ६०२ विद्यार्थ्यांना ते मिळाले. व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक म्हणून या उपक्रमांकडे पाहण्याऐवजी अतिरिक्त गुणांसाठी अशा उपक्रमांतील सहभाग वाढत असल्याचे यंदाचे निरीक्षण. त्यामुळेच यातील कला-क्रीडा प्रकारांत पुढे करिअर करणारे किंवा चमकणारे खरेच किती असतील, हा प्रश्न ‘ऑप्शन’ला टाकलेलाच बरा. अलीकडे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांमध्येही गमतीने असे म्हटले जाते, की अंतर्गत गुणांच्या ‘खिरापती’मुळे प्रत्यक्ष लेखी परीक्षेला ८० पैकी जेमतेम १५-२० गुण मिळाले, तरी विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याने, दहावीची परीक्षा अनुत्तीर्ण होणेच आता अधिक अवघड आहे! विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांनाही आवडणाऱ्या ‘परीक्षां’द्वारे केले जाणारे मूल्यमापन व्यवस्थेने या पातळीवर आणून ठेवले आहे. अशा वेळी ‘भरघोस’ गुणांचे अन्वयार्थ अधिक सजगपणे लावणे आणखी आवश्यक ठरते.

हेही वाचा

दहावीची परीक्षा ‘भरघोस’ गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि पालकांस करिअरच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पडू लागली असतील, तर त्यात काहीही वावगे नाही. मुद्दा इतकाच, की या उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या करिअरच्या वाटेवर चालण्यासाठी पाऊल टाकताना पडलेले गुण आणि त्या विद्यार्थ्याची त्या त्या विषयातील गुणवत्ता यांचा मेळ घातला गेला आहे का, हे तपासले जाते का? आधी म्हटले तसे ‘दहावीला किती गुण’ला जसे आपल्याकडे वलय आहे, तसे ‘इतके गुण म्हणजे आता पुढे अभियांत्रिकी किंवा वैद्याकीय वा फार तर सीए, सीएसचा रस्ता’ अशा पालुपदालाही अजून वलय आहे. त्यात आणखी भर पडली आहे, ती फॉरेन्सिक अकाउंटंट, डिझायनर, वैमानिक, जैवतंत्रज्ञ, अवकाशवीर वगैरे स्वप्नांची. अशी स्वप्ने पाहणेही वाईट नाही. प्रश्न आहे, तो दहावीचे गुण आणि त्याची वैयक्तिक वा कौटुंबिक स्तरावर केलेली कौतुकभरली चर्चा अशा स्वप्नांची वास्तवाला धरून पायाभरणी करतात का, हा. अगदी साधे उदाहरण घ्यायचे, तर केवळ ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले म्हणून विज्ञान शाखेला प्रवेश घेणे उत्तम इतके सरधोपट गणित मांडून चालत नाही. त्या विद्यार्थ्याचे व घरच्यांचे मुलाने अभियंता व्हायचे स्वप्न जरूर असेल, पण त्याच्या दहावीच्या गुणांसाठी धरल्या गेलेल्या ‘बेस्ट फाइव्ह’ विषयांत गणित विषयातच कमी गुण मिळाल्याने धरला गेला नसेल, तर मुळात अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेची तयारी किती अवघड जाणार आहे, याची तयारी त्याने आणि घरच्यांनी केलेली बरी, असा हा मुद्दा आहे. त्याही पुढे जाऊन अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांतच काय, ‘आयआयटी’सारख्या संस्थांतही खालावलेली कॅम्पस भरती, प्राथमिक परीक्षेला बसून पुढे वेगवेगळे टप्पे उत्तीर्ण होत अंतिमत: एकुणातील जेमतेम ५ टक्के विद्यार्थ्यांना साधणारे सीए, ‘यूपीएससी’साठी झटणाऱ्या काही लाखांतून प्रत्यक्ष यशस्वी होणारे काहीशे, पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करूनही मास्टर्स केल्याशिवाय पर्याय न राहिलेले वैद्याकीय क्षेत्र अशा वास्तवांचे आकलन जितके लवकर होईल, तितके बरे. या आणि एकूणच सगळ्या क्षेत्रांत उभे राहिलेले कृत्रिम प्रज्ञेचे आव्हान हा याचा आणखी नवा आयाम.

हेही वाचा

दहावीचा निकाल दर वर्षी वेगवेगळ्या पाल्य-पालकांना भरघोस आनंद देत असला, तरी अशा ‘भरघोस’ गुणांकडे डोळसपणे बघितले पाहिजे, हा सगळ्याचा मथितार्थ. यंदा जसे १०० टक्के मिळालेले २११ विद्यार्थी आहेत, तसे गेल्या काही वर्षांतही कमी-अधिक प्रमाणात असेच अनेक विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवत आहेत. या १०० टक्केवाल्यांपैकी कितींचे नवोद्याोग उभे राहतात, किती शास्त्रज्ञ म्हणून नावाजतात, किती मोठ्या कंपन्यांत मुख्य पदांवर पोहोचतात, याचाही कधी तरी शोध घ्यायला हवा. आज तरी या क्षितिजांवर फारशी मराठी नावे झळकताना दिसत नाहीत. दहावीचे गुण आणि करिअरची गुणवत्ता यांतील सांगड घालताना हेही लक्षात ठेवायला नको का?





Source link