
भाजपच्या 400+ ला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी काँग्रेसला सोबत घेऊन ‘इंडिया’ आघाडी तयार केली आहे. अनेक राज्यांमध्ये या आघाडीत जागा वाटपाबाबत एकमत झाल्याचे चित्र दिसत असले तरी काही राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
नवी दिल्ली : भाजपच्या 400+ ला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी काँग्रेसला सोबत घेऊन ‘इंडिया’ आघाडी तयार केली आहे. अनेक राज्यांमध्ये या आघाडीत जागा वाटपाबाबत एकमत झाल्याचे चित्र दिसत असले तरी काही राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी काँग्रेसने अनेक राज्यात मित्रपक्षासाठी जागा सोडण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत 290 जागांवरच उमेदवार उभे करण्यासाठी तयारीला लागली आहे.
काँग्रेस पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी 10 हून अधिक राज्यातील नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेस 290 जागांवर ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएने 351 जागा जिंकल्या होत्या आणि UPA ने 90 जागा जिंकल्या होत्या. एकट्या भाजपला 303 तर काँग्रेसला 52 जागांवर समाधान मानावे लागले होते.