
आयुष संजीव (वेदांत वानखेडे-३६ गुणी जोडी)
’३६ गुणी जोडी’ मालिकेतील ‘वेदांत’ अर्थात अभिनेता आयुष संजीव याने आपल्या कृष्ण जन्माष्टमीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की, ‘मी माटुंग्याला असतांना कृष्ण जन्माष्टमीचा, तसेच दहीहंडीचा थरार अनुभवला आहे. आम्ही सगळे सवंगडी एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने दहीहंडी फ़ोडायचो. एकदा तर मला प्रत्यक्ष शेवटच्या थरावर जाऊन दहीहंडी फोडायला मिळाली होती. तो फार अविस्मरणीय असा क्षण होता. मी आजही त्या क्षणाने इतका भारवलेलो आहे. माझी एक मनापासूनची इच्छा आहे की, बॉलिवूडमध्ये मला संधी मिळाली, तर प्रथम दहीहंडी फोडण्याचा प्रसंग किंवा गाणे चित्रित करायला मिळावे. अजून एक छानशी आठवण म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा बदलापूरला राहायला गेलो, तेव्हा तिकडे दहीहंडी फारशी कोणी साजरी करत नव्हते. त्यावेळी आम्हा दोघा भावंडांचा फारच हिरमोड झाला. मात्र, त्यावेळी आमच्या आईने घरामध्येच एक सुंदरशी दहीहंडी तयार करून आमची इच्छा पूर्ण केली. त्यावेळी माझ्या छोट्या भावाला कृष्ण बनवण्यात आले होते. आयुष्यात ही गोष्ट एक मखमली आठवण म्हणून कायम लक्षात राहील.’








