15 ऑगस्टपर्यंत HSRP लावणं बंधनकारक; अजूनही 70% वाहनधारकांनाच प्रतीक्षा!

0
1
15 ऑगस्टपर्यंत HSRP लावणं बंधनकारक; अजूनही 70% वाहनधारकांनाच प्रतीक्षा!

फलटण : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना! एक एप्रिल २०१९ पूर्वीची वाहने असणाऱ्यांना आता उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अनेक वाहनधारकांनी याबाबत आवश्यक ती पावले उचललेली नाहीत. परिणामी, सरकारने आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देत १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. ही शेवटची मुदत असून, यानंतर पाटी न बसवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

सध्या राज्यात सुमारे दोन कोटी जुन्या वाहनांपैकी केवळ ३० टक्के वाहनांवरच HSRP बसविण्यात आलेली आहे. अपुरी केंद्रे, प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आणि तांत्रिक अडचणी यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी, फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अंमलबजावणीत अपेक्षित प्रगती झालेली नाही.

यापूर्वी ३१ मार्च, नंतर ३० एप्रिल आणि त्यानंतर ३० जून अशी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अजूनही पाटी बसवण्यात फारशी वाढ न झाल्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहनधारकांकडून आणखी मुदतवाढीची मागणी करण्यात आली. यावर कारवाई करत सरनाईक यांनी १५ ऑगस्ट २०२५ ही शेवटची मुदत असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी अधिकृत निवेदनही प्रसिद्ध केले आहे.

🔍 HSRP म्हणजे नेमकं काय?

  • अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेली प्लेट
  • जाडी 1 मिमीपेक्षा थोडी अधिक
  • क्रोमियम बेस्ड होलोग्राम स्टिकर
  • टॅम्पर-प्रूफ लॉक
  • लेझर कोडेड 10 अंकी PIN

वाहनधारकांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी आपल्या वाहनाला HSRP बसवून घेणे अत्यावश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई टळणार नाही.