
हिम्मतरावांना नानासाहेबांच्या खोलीत जाताना पाहून ऐश्वर्याला आधीच शंका आली होती. दोन दिवसांपूर्वीच हिम्मतराव नानांकडून एक लाख रुपये घेऊन गेले, मग आता ते पुन्हा कशासाठी आले आहेत?, असा प्रश्न तिला पडला होता. दाराला कान लावून तिने नाना आणि हिम्मतरावांचं काही बोलणं ऐकलं. मात्र, ते काही तिच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे तिने हिम्मतरावांचा पाठलाग करत आश्रम गाठलं. हिम्मतराव यांच्या आश्रमात पोहोचल्यावर ऐश्वर्याने तिथल्या सिक्युरिटी गार्डकडे आश्रमाबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली. हे आश्रम नानासाहेबांचं आहे का?, असं तिने विचारलं. मात्र, यावर उत्तर देताना सिक्युरिटी गार्ड म्हणाला की, ‘हे आश्रम हिम्मतरावांचं आहे, तर नानासाहेब रणदिवे हे इथले देणगीदार आहेत. नानासाहेबांनी दिलेल्या पैशावरच आश्रम सुरळीतपणे चालतं.’








