
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत मला तडीपार करणार असल्याचा दावा केला होता. यावर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीवारी केली. निवडणूकीपूर्वीची त्यांची ही वारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत मला तडीपार करणार असल्याचा दावा केला होता. यावर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, “आमचे खूप हितचिंतक आहेत. ते हितचिंतक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन काहीतरी सांगत असतात. त्यावर जरांगे पाटील बोलतात. असं कुणालाही तडीपार केले जात नाही. तडीपार करण्यासारखे त्यांच्यावर खटले दाखल आहेत का? तर तसे अजिबात नाही. अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे काम करत असतात. अशी लोक जरांगे पाटील यांना काहीतरी सांगत असतात. जरांगे पाटील आणि आंदोलकांवर ज्या केसेस दाखल आहेत, त्या मागे घेतल्या जाणार आहेत,” असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.








