
फलटण (प्रतिनिधी) – फलटण येथील न्यायालयाच्या आवारात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख बसविण्यात यावा, अशी मागणी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री. नितीन आर. बोरकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनावर हरिश हणमंत काकडे, आदर्श विरसिंह अहिवळे, शशीकांत अहिवळे, संघराज अहिवळे, अनिकेत अहिवळे, सुजल गायकवाड, संघकारा अहिवळे, सहिल अहिवळे, राज घोडके, संघर्ष अहिवळे, संविधान काकडे, निसर्ग सावंत, प्रणव काकडे, अमर अहिवळे, प्रेम अहिवळे आणि स्वप्नील काकडे यांच्या सह्या आहेत.
संविधानाचीमूल्येजनतेपर्यंत_पोहोचावीत
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संविधान हे देशाच्या शासन व्यवस्थेचे मूलभूत तत्त्वज्ञान व मार्गदर्शक तत्वे निश्चित करणारे सर्वोच्च दस्तऐवज आहे. संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा समावेश असून, हीच भारतीय लोकशाहीची खरी ओळख आहे.
न्यायालय हे न्यायदानाचे पवित्र स्थान असून येथे दररोज सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, वकील आणि विविध स्तरांतील लोक येत असतात. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख उभारल्यास नागरिकांना संविधानातील मूल्यांची जाणीव होईल व लोकशाही तत्त्वांबद्दल जागरूकता वाढेल, असे मंडळाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
लोकशाहीमूल्यांचे प्रतीक
संविधान उद्देशिका ही देशाच्या एकात्मतेचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. न्यायालयाच्या परिसरात तिचा शिलालेख उभारणे म्हणजे न्यायव्यवस्थेप्रती आदर व्यक्त करण्याबरोबरच नागरिकांमध्ये संवैधानिक कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
मागणीवर सकारात्मक विचार करून न्यायालय प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.








