फलटणमधील शेतकरी व विक्रेत्यांची मागणी – आठवडी बाजाराचे स्थळ बदलण्याचा आग्रह

0
1
फलटणमधील शेतकरी व विक्रेत्यांची मागणी – आठवडी बाजाराचे स्थळ बदलण्याचा आग्रह

फलटण, 27 मार्च: फलटण शहरातील 402 शेतकरी आणि मंडई विक्रेत्यांनी प्रशासनाकडे आठवडी बाजाराच्या स्थळात बदल करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारचा आठवडी बाजार माळजाई मंदिरासमोर आणि गिरवी नाका, तसेच मेटकरी गल्ली ते उमाजी नाईक चौक ते गजानन चौक-डेक्कन चौक परिसरात बसवावा. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी, फलटण नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

जुना निर्णय अयशस्वी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

चार आठवड्यांपूर्वी फलटण नगरपरिषदेकडून रविवारचा बाजार जुन्या बाजारपेठेत (रविवार पेठ) प्रायोगिक तत्त्वावर हलवण्यात आला. मात्र, या निर्णयामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. परिणामी, त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या चर्चेनंतर, त्यांच्या आक्रोशाची दखल घेत प्रशासनाने ऐच्छिक धोरण स्वीकारले, आणि रविवारचा बाजार वरील दोन भागांत बसवण्याचा तात्पुरता निर्णय घेतला.

नागरिक व विक्रेत्यांसाठी फायदेशीर निर्णयाची अपेक्षा

शेतकरी आणि विक्रेत्यांच्या मते, नव्या स्थळी बाजार भरवणे त्यांच्यासाठी तसेच फलटणमधील नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल. यासाठी त्यांनी ४०२ स्वाक्षऱ्यांसह प्रशासनाला निवेदन सादर केले.

फलटणमध्ये दररोज ताजी भाजी मंडई सकाळी व संध्याकाळी भरते. तसेच, शंकर मार्केट, महात्मा फुले भाजी मंडई, नागेश्वर मंदिर परिसर आणि शिवाजी चौक येथे नियमित बाजार भरतो. आठवडी बाजाराविषयी घेतला जाणारा अंतिम निर्णय शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताचा असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.