
Modi & Rahul Gandhi On RCB Stampede In Bangalore: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पहिल्या ‘आयपीएल’ जेतेपदाच्या सेलिब्रेशनला बुधवारी बंगळुरुमध्ये गालबोट लागलं. खेळाडूंना पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांच्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 47 जण जखमी झाले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाहत्यांची एकच झुंबड उडल्याने आणि नियोजनासंदर्भात पुरेशी व्यवस्था नसल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं होऊनही मैदानात खेळाडूंचा सत्कार समारंभ पार पडला. या वरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाची दखल घेतली.
मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाची दखल घेतली असून त्यांनी घडलेली घटना हृदयद्रावक असल्याचं नमूद केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन मोदींची या दुर्घटनेवरील प्रतिक्रिया पोस्ट करण्यात आली आहे. “बेंगळुरूमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत आहेत. जखमींना लवकर बरं वाटावं अशी मी प्रार्थना करतो,” असं मोदींनी म्हटल्याचं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.
The mishap in Bengaluru is absolutely heartrending. In this tragic hour, my thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that those who are injured have a speedy recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2025
कोणताही उत्सव कोणाच्या जीवापेक्षा मोठा नाही: राहुल गांधी
दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनीही या प्रकरणावर भाष्य करताना, कोणतंही सेलिब्रेशन हे एखाद्याच्या जीवापेक्षा अधिक मोठं नसावं, असं म्हटलंय. “बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या समारंभात झालेली चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. जखमी झालेल्या सर्वांना लवकर बरं वाटावं म्हणून मी प्रार्थना करतो,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, “या दुःखाच्या वेळी, मी बेंगळुरूच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. कर्नाटक सरकारने पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवली पाहिजे,” अशी अपेक्षाही राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.
“ही दुर्घटना एक वेदनादायक आठवण आहे. कोणताही उत्सव मानवी जीवनापेक्षा अधिक मूल्यवान नसतो. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी प्रत्येक सुरक्षा नियमांचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि काटेकोरपणे अंमलात आणले पाहिजे – कोणाचेही प्राण हे कायमच प्रथम प्राधान्य क्रमावर असले पाहिजेत,” असंही राहुल यांनी म्हटलं आहे.
The tragic stampede near Bengaluru’s Chinnaswamy Stadium during RCB’s IPL victory celebrations is heartbreaking.
My condolences to the families who lost their loved ones. Wishing a swift and full recovery to all those injured.
In this hour of grief, I stand with the people of…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 4, 2025
मुख्यमंत्री म्हणतात, एवढी गर्दी येईल असं अपेक्षित नव्हतं
मैदानाची क्षमता 35 हजार प्रेक्षकांची असताना मैदानाबाहेर 2 ते 3 लाख चाहत्यांनी गर्दी केली होती, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.