
काल तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज लगेचच प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्याचबरोबर जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आहे.
दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना इडीने अटक केली होती. त्यामुळे आपच्या लोकसभा निवडणूक प्रचारावर परिणाम झाला होता. सुप्रीम कोर्टाने लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी केजरीवालांना जामीन दिला आहे. काल तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज लगेचच प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्याचबरोबर जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आहे.
कॅनॉट प्लेस येथील प्राचीन हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेत अरविंद केजरीवाल यांनी दिवसाची सुरुवात केली. बजरंगीबलीची त्यांच्यावर कृपा असल्याचे देखील केजरीवाल म्हणाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले, ‘आत्ताच मी, माझी पत्नी आणि भगवंत मान कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात गेलो होतो. तेथे आशीर्वाद घेतले. बजरंगबलीने आपल्यावर खूप आशीर्वाद दिला आहे. त्यांच्या कृपेने आज मी तुमच्यामध्ये आहे. निवडणुकीच्या वेळी तुरुंगातून सुटून मी तुमच्यामध्ये येईन, अशी अपेक्षा कुणालाही नव्हती. आमचा आम आदमी पक्ष हा एक छोटा पक्ष आहे. आम्ही दोन राज्यात आहोत. हा पक्ष 10 वर्षे जुना आहे, पण आमच्या पक्षाला चिरडून टाकण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. असे मत केजरीवाल यांनी व्यक्त केले.










