Thursday, August 13, 2026
Homeसाताराफलटण आठवडी बाजाराचा प्रश्न गंभीर; नगरपरिषदेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

फलटण आठवडी बाजाराचा प्रश्न गंभीर; नगरपरिषदेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

फलटण :-  शहरात गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजाराच्या ठिकाणाबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पूर्वी हा बाजार उमाजी नाईक चौक येथे भरत होता, मात्र कोरोना महामारीनंतर तो माळजाई मंदिरासमोर स्थलांतरित झाला. परंतु, काही आठवड्यांपूर्वी नगरपरिषदेच्या आदेशानुसार बाजार पुन्हा उमाजी नाईक चौकात हलवण्यात आला.

या वारंवार होणाऱ्या बदलामुळे शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून विक्रेते आणि शेतकरी माळजाई मंदिरासमोरच बसू लागले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल (रविवार) देखील आठवडी बाजार माळजाई मंदिरासमोर तसेच महावीर स्तंभ ते गजानन चौक या परिसरात भरवण्यात आला.

दरम्यान, फलटण नगरपरिषदेने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी हा मुद्दा पोलीस प्रशासनाकडे सोपवला असला तरी अद्याप कोणताही आदेश पारित करण्यात आलेला नाही. मात्र, लवकरच नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक होणार असून अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

या गोंधळामुळे वाहतूक कोंडी आणि गर्दीचा प्रश्न निर्माण झाला असून, शहरातील अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने शेतकरी व भाजी विक्रेत्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments