माझ्या हिश्श्याचे किस्से: बोनी कपूर यांनी जेव्हा गाण्याच्या गुणवत्तेशी तडजोड करण्यास दिला होता नकार…

0
15
माझ्या हिश्श्याचे किस्से:  बोनी कपूर यांनी जेव्हा गाण्याच्या गुणवत्तेशी तडजोड करण्यास दिला होता नकार…


रूमी जाफरी, चित्रपट लेखक, दिग्दर्शक5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘मैदान’ चित्रपटाच्या सेटवर अजय देवगणसमवेत निर्माते बोनी कपूर. 

काही दिवसांपूर्वी अजय देवगणचा “मैदान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मी त्याच्या प्रीमियरला गेलो तेव्हा तिथं आलेले सगळे जण “मैदान’सारख्या मोठ्या आणि महागड्या चित्रपटाच्या संदर्भाने निर्माते बोनी कपूर यांच्याविषयी बोलत होते. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी बोनी कपूर यांच्याबद्दल सांगणार आहे.

मला आठवतंय, ऋषी कपूर यांनी मला सांगितलं होतं… रूमी, ही गोष्ट १९७६ – ७७ ची आहे. मी कोल्हापूरला शूटिंगसाठी गेलाे होतो. बोनी कपूरचे वडील सुरिंदर कपूर निर्माते होते. बोनी प्रॉडक्शनचे काम पाहत होता. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ नावाचा हा चित्रपट होता. त्यातील गाण्याचं शूटिंग सुरू होतं. कमल मास्टर नृत्य दिग्दर्शक होते. साधारण ९०-९५ डान्सर होते. खूप चांगली व्यवस्था होती. लंच ब्रेकनंतर कमल मास्टरांनी बोनी कपूरला बोलावले आणि म्हणाले, “आज माझा शूटिंगचा शेवटचा दिवस आहे, माझ्या तारखा संपताहेत. उद्यापासून मुंबईत माझं दुसऱ्या चित्रपटाचं गाणं आहे. मी संध्याकाळी पॅकअपनंतर मुंबईला जाईन.’ बोनी म्हणाला, “मास्टरजी, गाणं असं अर्धवट सोडून तुम्ही कसं जाऊ शकता?’ कमल मास्टरांनी सांगितले, “राहिलेल्या अंतऱ्याचे शूटिंग मुंबईत करून घेऊ.’ कमल मास्टरांंना वाटलं, हा सुरिंदर कपूरचा मुलगा आहे. जेमतेम २०-२१ वर्षांचा.. माझ्याशी युक्तिवाद करणार नाही. पण, बोनी म्हणाला, “मला इथलं लोकेशन आवडलं म्हणून मी इतका खर्च करून कोल्हापूरला आलोय. मुंबईलाच शूटिंग करायचं होतं तर मी इथं आलोच नसतो.’ यावर कमल मास्टरांनी आपल्या तारखा संपत असल्याचं पुन्हा सांगितलं. बोनी म्हणाला,‘तारखा संपत होत्या, तर आधीच तुम्ही गाणं पूर्ण करायला पाहिजे होतं.’ कमल मास्टर म्हणाले, “उद्यापासून माझ्या दुसऱ्या चित्रपटाचं गाणं आहे.’ बोनीने निर्वाणीच्या सुरात सांगितले की, माझ्या चित्रपटाचं गाणं पूर्ण केल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. मी तुमचं तिकीट काढणार नाही, तुम्हाला गाडीही देणार नाही.

कमल मास्टर त्या वेळी इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या नृत्य दिग्दर्शकांपैकी एक होते, त्यांची खूप प्रतिष्ठा होती. त्यांच्याशी बोलण्याची कोणी हिंमत करत नसे. त्यामुळे बोनी कपूर असं बोलल्याने कमल मास्टरांना राग आला. ‘ठीक आहे,’ असं म्हणत त्यांनी कॅमेरामनला बोलावलं आणि त्याला १०० फुटांची ट्रॉली लावायला सांगितली. असिस्टंट सुजाताला बोलावून, संपूर्ण अंतऱ्याची रिहर्सल करून घ्या, असं सांगितलं. बोनी हे सगळे पाहत होता. शॉट रेडी होत असताना बोनी म्हणाला, ‘मास्टरजी, हे काय सुरू आहे?’ कमल मास्टर म्हणाले की, “तूच म्हणाला ना की गाणं पूर्ण करा आणि मगच मुंबईला जा. मी गाणं पूर्ण करतोय. त्यासाठी ही ट्रॉली लावली आहे. एका शॉटमध्ये अंतरा, दुसऱ्यामध्ये मुखडा पूर्ण करेन, क्रॉस लाइन करेन.’

हे ऐकून बोनी म्हणाला, ‘मी तुम्हाला गाणं पूर्ण करायला सांगितले होते, त्याचे बारा वाजवायला सांगितले नव्हते.’ बोनीचा राग अनावर झाला. यापेक्षा मीच पॅकअप करतो म्हणत, ‘पॅकअप..’ असं ओरडून जाहीर केलं. सारे युनिट, सगळे नृत्य कलाकार आणि मास्टरजीही बघतच राहिले. बोनी म्हणाला, “मी पॅकअप करेन, नुकसान सहन करेन, पण आपल्या गाण्याचे बारा वाजू देणार नाही.’ मग मास्टरजींना सांगितलं, मी तुमची सर्व व्यवस्था करून देईन. तुम्ही जा.

ऋषी कपूरनी मला पुढं सांगितलं होतं… मी माझ्या गाडीने हॉटेलकडे जात होतो. बोनी माझ्या गाडीत बसला आणि आम्ही हॉटेलला गेलो. मी बोनीला म्हणालो की, तू हे जे कमल मास्टरना बोलून दाखवलंस, तुझ्यात ही हिंमत आहे. तू स्वत:चे नुकसान सहन केलंस, पण गाण्याबाबत तडजोड केली नाहीस, ते खराब होऊ दिलं नाहीस. तू कमल मास्टरांसोबतचे संबंध बिघडवलेस. मी खात्रीने सांगतो की, तू एक दिवस इंडस्ट्रीतील सर्वात मोठा निर्माता होशील. त्या प्रसंगानंतर कमल मास्टर थांबले आणि दुसरा पूर्ण दिवस खर्च करून गाणं पूर्ण केल्यावरच ते कोल्हापुरातून गेले.

मी बोनी साहेबांना या गोष्टीविषयी बोललो तेव्हा ते म्हणाले की, नसीरुद्दीन साहेबही ही गोष्ट “हम पांच’च्या शूटिंगच्या वेळी माझ्याबाबत बोलले होते. “हम पांच’च्या वेळी नसीर साहेब मला सॅम स्पीगल म्हणून हाक मारायचे. सॅम हॉलीवूडमधील टॉपचे निर्माते आणि ‘एमजीएम’चे मालक होते. बोनी यांनीही “हम पांच’साठीही गावाचा सेट बंगळुरूपासून १५० किलोमीटरवर लावला होता. तिथे सर्व कलाकारांसाठी थिएटर, क्लब हाऊस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल कोर्टसह सगळ्या फाइव्ह स्टार सुविधा तिथं उभ्या केल्या होत्या. काही लोकांना वर्तमानपत्र वाचण्याची आवड होती, त्यांच्यासाठी एक जण रोज ५० किलोमीटरवरून ते घेऊन यायचा. बोनी साहेबांच्या या उमद्या स्वभावावरून बद्र वास्ती यांचा एक शेर आठवतोय…

इरादों और उम्मीदों को

कभी मरने नहीं देना,

वहीं से राह मिलती है

जहाँ रास्ता नहीं मिलता।

सतीश कौशिक नेहमी म्हणायचे की, इतर निर्मात्यांना मर्सिडीझ मागितली तर ते फियाट देतात. दोन कार मागितल्या तर एक देतात. फक्त बोनी कपूरच असे निर्माते आहेत, ज्यांना मर्सिडीझ मागितली तर रोल्स देतील, एक मागितली तर दोन देतील. मी पाहिले आहे, “मॉम’मध्ये त्यांनी जॉर्जियाच्या बर्फाळ डोंगरांमध्येही युनिटला गरम जेवण मिळावे म्हणून तंदूर आणि किचन बनवले होते. आणि आता मी “मैदान’मध्ये पाहिलं की, इतक्या मोठ्या स्टेडियमचा सेट लावलाय, विदेशातून खेळाडू आले. लॉकडाऊनमध्ये शूटिंग थांबलं होतं, सेट तसाच उभा होता, त्याचे भाडे सुरूच होते. प्लेअर अडकून पडले, दीड वर्ष सेटचा खर्च झाला, सिनेमा ओव्हर बजेट झाला. त्याचं व्याजही खूप वाढलं. परंतु, बोनी साहेबांनी मेकिंगमध्ये तडजोड केली नाही. चित्रपट जसा सुरू होता, तसा तो पूर्ण केला आणि तसाच प्रदर्शितही केला. आणखी एक गोष्ट सतीशजी नेहमी सांगायचे, “रूप की रानी चोरों का राजा’ आणि “प्रेम’ हे दोन्ही खूप खर्च केलेले चित्रपट तितकेच फ्लॉप ठरले. पण, तरीही बोनीने मला नेहमी काम दिले.’ ‘हम आपके दिल में रहते है’, ‘हमारा दिल आपके पास हैं’, ‘मिलेंगे मिलेंगे’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती बोनी यांनी केली. ते कधीच हिट आणि फ्लॉपची पर्वा करत नाहीत. बोनी कपूर यांच्यासारख्या मोठ्या निर्मात्याचा एक मोठा चित्रपट असेल्या ‘मिस्टर इंडिया’तील हे गाणं ऐका…

ज़िन्दगी की यही रीत है,

हार के बाद ही जीत है।

स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link