
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीतील भारताचा पहिला डाव २४५ धावांवर आटोपला. मंगळवारी पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने भारताला केवळ ५९ षटके खेळता आली. पहिल्या दिवशी ७० धावांवर नाबाद राहिल्यानंतर के.एल. राहुलने आज झुंजार शतक झळकावले. त्याच्या शतकासह भारताचा पहिला डाव २४५ धावांत गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गरने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. मात्र, सत्राच्या शेवटी भारतीय फलंदाजांनी डाव सावरत संघाला दिलासा दिला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली (३८) आणि के. एल. राहुलचे (७०) नाबाद अर्धशतक यांच्यामुळे भारताला दोनशेच्या पुढे जाता आले. मंगळवारी ५९ षटकांनंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यातच नंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली होती. यावेळी भारताच्या ५९ षटकांत ८ बाद २०८ धावा झाल्या होत्या. के. एल. राहुल ७० धावांवर नाबाद होता. ढगाळ वातावरणात ८ बाद २०८ धावांवर आज भारताचा दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. के.एल. राहुलने १३३ चेंडूत १०१ धावा केल्या. तर सिराजने २२ चेंडूत केवळ ५ धावा करून माघारी परतला.
1ST Test. 65.6: Gerald Coetzee to K L Rahul 6 runs, India 245/9 https://t.co/032B8Fn3iC #SAvIND
— BCCI (@BCCI) December 27, 2023
विराटने रोहितला टाकले मागे
सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्याच दिवशी विराट कोहलीने हिटमॅनला मागे टाकले आहे. विराटने ३४ धावांचा टप्पा पार करताच तो डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक धावा करणारा नंबर एक भारतीय फलंदाज बनला आहे. रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चॉम्पयनशिपमध्ये २६ सामन्यांच्या ४२ डावांमध्ये २,०९७ धावा आहेत. मात्र, आता विराट कोहलीने सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात ३८ धावा करत रोहितला मागे टाकले. कसोटी चॅम्पियनशिपच्या ३५ सामन्यांच्या ५७ डावांमध्ये विराटच्या नावावर २,१०१ धावा जमा झाल्या आहेत. रोहितने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत ७ शतके आणि ६ अर्धशतके फटकावली आहेत; तर विराटच्या नावावर ४ शतके आणि ९ अर्धशतके आहेत. विराटची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद २५४ आहे, तर रोहितची सर्वोत्तम धावसंख्या २१२ आहे.





