Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिश्श्याचे किस्से: सचिन पिळगावकर : पाचव्या वर्षी मिळाला होता पुरस्कार, पंतप्रधानांनी मांडीवर...

माझ्या हिश्श्याचे किस्से: सचिन पिळगावकर : पाचव्या वर्षी मिळाला होता पुरस्कार, पंतप्रधानांनी मांडीवर बसवून घेतले होते

माझ्या हिश्श्याचे किस्से: सचिन पिळगावकर : पाचव्या वर्षी मिळाला होता पुरस्कार, पंतप्रधानांनी मांडीवर बसवून घेतले होते

[ad_1]

रूमी जाफरी, बाॅलीवूड चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बालकलाकाराचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना सचिन पिळगावकर. मंचावर तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूही दिसत आहेत. त्यावेळी सचिन केवळ पाच वर्षांचे होते. 

सचिन परत निघाले तेव्हा त्यांना, ‘सुनो!’ असा आवाज आला. त्यांनी वळून पाहताच पंडित नेहरूंनी खुणेने जवळ बोलावले आणि त्यांना उलचून आपल्या मांडीवर बसवले. स्वत:च्या खिशाला लावलेला गुलाब काढला अन् सचिन यांच्या खिशावर लावला. त्यांची पाठ थोपटून म्हणाले, ‘खूप पुढे जाशील तू…’

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी आज तुम्हाला सचिन पिळगावकर यांच्याबाबत काही सांगणार आहे. तीन दिवसांपूर्वी, म्हणजे १७ ऑगस्टला त्यांचा वाढदिवस होता. मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला तेव्हा त्यांच्याबद्दल काही नवी माहिती मिळाली. खरं तर त्यांचे आणि माझे ३३ वर्षांपासून स्नेहसंबंध अाहेत. परंतु, बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या मनात इतक्या गोष्टी, इतके किस्से, इतके प्रसंग दाबून ठेवतात असतात की, आपण त्यांना ओळखत असूनही पूर्णपणे ओळखू , समजू शकत नाही. आपल्याला त्यांचा टप्प्याटप्प्याने थांग लागत जातो. त्यांना समजून घेण्यास आयुष्यही कमी पडते. असो. सचिनजींनी मला सांगितले की, आपण खूप मोठा अधिकारी व्हावं, अशी त्यांच्या आईंची इच्छा होती आणि वडिलांना वाटत होते की त्यांनी चित्रपटात काम करावं. जेव्हा त्यांना राजा परांजपे यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ या मराठी चित्रपटाची ऑफर आली तेव्हा त्यांच्या आईंनी, ‘हा तुझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल,’ असे बजावूनच त्यांना परवानगी दिली. पण म्हणतात ना, ‘प्रतिभा ही वाहत्या पाण्यासारखी असते, ती स्वत: आपली वाट शोधत जाते.’ हा चित्रपट पुढे राष्ट्रीय पुरस्कारासाठी पाठ‌वला गेला. (तेव्हा या पुरस्काराला राष्ट्रपती पुरस्कार म्हटले जात होते, कारण तो राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येत होता. नंतर त्याचे नाव बदलून राष्ट्रीय पुरस्कार करण्यात आले.) हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी गेला आणि ज्युरींनी तो पाहिला तेव्हा ते म्हणाले, ‘या चित्रपटात त्या मुलाने जे उत्कृष्ट काम केले आहे, ते पाहता पुरस्कार तर त्यालाच दिला पाहिजे. या मुलालाच पुरस्कार मिळायला हवा.’ मात्र त्या वेळेपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बालकलाकारासाठी पुरस्कार नव्हता. मग सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही याच वर्षीपासून सुरू करावा, असा निर्णय ज्युरींनी तसेच मंत्रालयाने घेतला आणि सचिन पिळगावकर यांना हा पहिला पुरस्कार मिळाला. सचिनजी जेव्हा हा पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेले, तेव्हा ते फक्त पाच वर्षांचे होते. त्यांना सांगण्यात आले होते की, तुझे नाव घेतल्यावर सरळ मंचावर जायचे आणि वाकून नमस्कार करायचा, पुरस्कार घ्यायचा आणि तसेच वळून परत यायचे आणि खुर्चीवर बसायचे. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी सचिनजींच्या आईंनी त्यांना काळ्या रंगाचा शेरवानी चुडीदार- पायजामा असा पोशाख केला. पायात मोजडी घालून दिली. आणि भीती वाटली तर घाम पुसण्यासाठी एक पांढरा रूमालदेखील त्यांच्या खिशात ठेवला होता. कार्यक्रम सुरू झाला तेव्हा सचिनजी आपल्या आई आणि वडिलांसोबत बसले होते. आईंनी त्यांना सांगितले की, जे मंचावर उभे आहेत, ते आपले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत आणि ज्यांनी जॅकेट घातले आहे, ते आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. नाव पुकारल्यावर ते मंचाकडे निघाले, तेव्हा सारे राष्ट्रपती भवन एक पाच वर्षांचा मुलगा पुरस्कार घेण्यासाठी येतो आहे हे पाहात होते. सचिनजी मंचावर गेले, वाकून नमस्कार केला. राधाकृष्णनजींनी त्यांना पुरस्कार दिला आणि ते वळून परत निघाले तेव्हा त्यांना, ‘सुनो!’ असा आवाज आला. त्यांनी वळून पाहताच पंडित नेहरूंनी त्यांना खुणेने आपल्याजवळ बोलावले. त्यांच्याजवळ गेल्यावर पंडितजींनी त्यांना उलचून आपल्या मांडीवर बसवले. स्वत:च्या खिशाला लावलेला गुलाब काढला आणि सचिनजींच्या खिशावर लावला. मग त्यांची पाठ थोपटून म्हणाले, ‘खूप पुढे जाशील तू.. जा..’ जेव्हा ते परत चालत आपल्या जागेवर आले, तेव्हा आई रडत असल्याचे त्यांना दिसले. ते म्हणाले, ‘मी छोटा होतो, मी घाबरलो. मला वाटले की, माझ्याकडून काही चुकलं असणार. नाहीतर आई का रडली असती? त्या दिवशी पहिल्यांदा मला आनंदानेही अश्रू ओघळतात, हे जाणवले. आई मला म्हणाली, ‘बेटा! तू याच कामासाठी जन्मला आहेस.’ आणि त्यानंतर तिने मला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली. यानंतर मला ‘जिम्बो का बेटा’ हा पहिला हिंदी चित्रपट मिळाला. त्याचे निर्माते होमी वाडिया होते, त्यांनी जिम्बो सिरीजच्या तीन चित्रपटांची निर्मिती केली. पहिला होता ‘जिम्बो’, नंतर ‘जिम्बो कम टू टाऊन’ आणि तिसरा ‘जिम्बो का बेटा’ होता. हा खऱ्या अर्थाने पहिलाच हिंदी चित्रपट होता, ज्यामध्ये बालकलाकाराची मुख्य भूमिका होती. ‘झिम्बो का बेटा’ म्हणजेच मुलाची कथा. ही भूमिका मलाच मिळाली होती.’ ‘झिम्बो का बेटा’नंतर सचिनजींना दुसरा चित्रपट मिळाला ‘ब्रह्मचारी’. सचिन अशा निवडक कलाकारांपैकी एक होते, जे चित्रपटांमध्ये नायकाच्या बालपणीची किंवा त्याच्या भावाची भूमिका नव्हे, तर बालकलाकाराची मुख्य भूमिका साकारायचे. त्यानंतर मोठे झाल्यावर त्यांनी ‘गीत गाता चल’, ‘आखियों के झरोखों से’, ‘अवतार’, ‘नदियाँ के पार’सारखे लागोपाठ सुपरहिट चित्रपट दिले. त्यानंतर ते अभिनेता झाले, स्टार झाले, दिग्दर्शक झाले, निर्माता झाले, एडिटर झाले आणि अगदी शायरही झाले. त्यांनी ‘शफ़क़’ या नावाने शायरी करायला सुरूवात केली. ते मजरूह सुलतानपुरी साहेबांचे शिष्य होते. मीनाजींकडून ते उर्दू शिकले होते. म्हणून इथे त्यांचाच हा एक शेर… जिस एहतराम से लहरों ने मेरे क़दम हैं चूमे, कैसे करूँ यक़ीन इन्होंने डुबोई हैं कश्तियाँ। आणि हो! दोन चित्रपट तर असे आहेत, ज्यामध्ये महान अभिनेते संजीवकुमार यांची दुय्यम भूमिका होती आणि मुख्य भूमिकेत सचिनजी होते. एक चित्रपट होता ‘चंदा आैर बिजली’ आणि दुसरा ‘बचपन’. ‘चंदा और बिजली’च्या बाबतीत लोक संजीवकुमार साहेबांची चेष्टा करायचे की, ‘चंदा आैर बिजली’मध्ये चंदा तर सचिन आहे आणि बिजली पद्मिनी आहे, मग तुम्ही कोण आहात? त्यावर संजीवकुमार उत्तर द्यायचे, ‘चंदा सचिन आहे, बिजली पद्मिनी आहे आणि “चंदा और बिजली’मध्ये जो ‘और’ आहे तो मी आहे!’ यासाेबतच मी माझा हा किस्सा संपवतो. सचिनजींच्या ‘गीत गाता चल’ चित्रपटातील हे शीर्षकगीत ऐका… गीत गाता चल, ओ साथी गुन-गुनता चल। स्वत:ची काळजी घ्या. आनंदी राहा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments