रसिक स्पेशल: रोबोट माणसाची ‘स्पेस’ घेईल?

0
15
रसिक स्पेशल: रोबोट माणसाची ‘स्पेस’ घेईल?


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Robots Will Take The Space Of Humans Pratik Koske 

प्रतिक कोसके14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एखादी भावना माणसाच्या मनात तयार होत असताना नक्की कोणती रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्या प्रक्रियेचे फलित काय असते, याची माहिती रोबोटना दिली जाऊ शकते. परंतु, त्यांच्याकडून तशा उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, ही ‘एआय’ची मर्यादा आहे.
एखादी दु:खद घटना घडली, तर रोबोटलाही दुःख वाटेल, तो प्रत्यक्ष अश्रू ढाळेल, असे प्रोग्रामिंग त्यात करता येईल. पण, हास्य, आनंद, राग, भीती यांसारख्या उत्स्फूर्त मानवी भावना ‘जशाच्या तशा’ रोबोट व्यक्त करू शकत नाहीत, हे तितकंच खरं.

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे नुकतीच नऊ मानवसदृश रोबोट्सनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या पुढाकारातून ‘AI For Good’ या थीमवर जगभरातील रोबोट्सची कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. हवामान बदल, भूक आणि अन्नधान्य उत्पादन, सामाजिक सुरक्षा यांसारख्या जागतिक समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence – AI) वापर कसा करता येईल, यावर विचारमंथन करण्यासाठी घेतलेल्या या कॉन्फरन्समध्ये तीन हजार तज्ज्ञांसह ५१ रोबोट सहभागी झाले होते. या कॉन्फरन्सला जोडूनच ही एआय संचालित रोबोट्सची इतिहासातील पहिलीच पत्रकार परिषद झाली. ही परिषद पार पडते न पडते, तोच पुन्हा एकदा मानव आणि रोबोट्स, मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील परस्परसंबंधांची, त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानामुळे भविष्यात येऊ घातलेल्या आव्हानांची चर्चा जगभर सुरू झाली.

मानसिक, सामाजिक परिणामांचे आव्हान :
कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेच्या मर्यादा ओलांडून पुढे जाणार का? रोबोट्स जर मानवी भावना शिकू लागले आणि त्यातून त्यांचा भावनिक बुद्ध्यांकही (Emotional Quotient) विकसित झाला तर काय होईल? माणसातील परस्परसंबंधांवर याचे काय परिणाम होतील, असे एक ना अनेक प्रश्न! एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे या प्रश्नांच्या मुळाशी औत्सुक्य आणि भीती या दोन भावना आहेत. भावनांची ‘स्पेस’ काबीज करीत रोबोट मानवाची जागा घेणार का, ही भीती अलीकडे प्रकर्षाने व्यक्त केली जात आहे. एवढेच काय, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा अफाट वेग पाहता, भविष्यात माणसाच्या जोडीदाराची जागा रोबोट घेईल का, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणारे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू, ब्रिटिश नागरिक डेव्हिड लेव्ही यांनी अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे रोबोट आणि एआयच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचे मानसिक, सामाजिक परिणाम काय होऊ शकतात, त्याच्याशी माणसाने कसं जुळवून घ्यावं, यावर विचार होणं आवश्यक आहे.

मानवी भावनांचे विकसन अन् हेलकावे :
रोबोट्सनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं दिली, त्यातून हे दिसून येतं की, माणसाची विचार करण्याची पद्धत, त्यामागच्या भावना, कार्यकारणभाव यांचा अंदाज घेऊन रोबोट प्रश्नांची उत्तरे देत आहेत. भावनिक विकास झालेला रोबो आपण याआधी रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ या गाजलेल्या चित्रपटात पाहिला आहे. ज्या माणसाने तो ‘चिट्टी’ नावाचा रोबो बनवलेला असतो ,त्याच्याच आयुष्यात हा चिट्टी भावनिक पातळीवर सक्षम झाल्यानंतर कसा धुमाकूळ घालतो, हे या चित्रपटाने प्रभावीपणे दाखवले. ‘एआय’च्या मदतीने असे रोबोट प्रत्यक्षात येऊ शकतात का? या प्रश्नाचं ठाम उत्तर काळच देईल. पण, रोबोटच्या आणि मानवी भावनांच्या विकासाचा तुलनात्मक विचार केला, तर ‘एआय’च्या काही मर्यादा समोर येतात. मुळात मानवी भावना ही कोणत्याही परिस्थितीला दिलेली जैविक प्रतिक्रिया असते. भावनेची ठोस अशी मानववंशशास्त्रीय मुळे असतात. ती आपल्या पूर्वजांच्या जीवनसंघर्षातून, त्यांचे लढे, त्यांचे जय-पराजय, आनंदाचे क्षण, संकटांच्या परिस्थिती या सगळ्यातून तयार झालेली असतात. म्हणूनच मानवी उत्क्रांतीचा आणि मानवाच्या भावनिक विकासाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. शतकानुशतके झालेल्या मेंदूच्या विकासामुळे आणि विचारांच्या गुंतागुंतीमुळे प्रत्येक भावनेचे अचूक कारण सांगणं शक्य नाही, परंतु या सर्व भावना मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत झालेल्या बोधात्मक क्रांतीशी (Cognitive Revolution) संबंधित आहेत. रोबोटच्या विचार केला, तर त्यांना अशा उत्क्रांतीचा कोणताही इतिहास नाही. मानवी मेंदूच्या जवळपास जाणारे रोबोट आपण तयार करण्यात यशस्वी झालो असलो, तरी त्यात संपूर्णपणे मानवी भावभावनांशी साधर्म्य असलेली भावनिक बुद्धिमत्ता विकसित झालेली नाही, ती यामुळेच. रोबोटच्या विकासात ‘एआय’ नावाचे जे तंत्रज्ञान वापरले जाते, त्याला माहिती पुरवण्याचे काम मानवच करत असतो. त्यातून मशीन लर्निंगच्या प्रक्रियेद्वारे रोबोट आपली बुद्धिमत्ता विकसित करतात. एखादी भावना माणसाच्या मनात तयार होत असताना नक्की कोणती रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्या प्रक्रियेचे फलित काय असते, याची माहिती रोबोटना दिली जाऊ शकते. परंतु, त्यांच्याकडून तशा उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, ही या तंत्रज्ञानाची मर्यादा आहे. एखादी दु:खद घटना घडली, तर रोबोटलाही दुःख वाटेल अशा प्रकारचे प्रोग्रामिंग त्यात करता येईल. तो प्रत्यक्ष अश्रू ढाळेल, अशी सोयही उपलब्ध करून दिली जाऊ शकते. पण, हास्य, आनंद, राग, भीती यांसारख्या उत्स्फूर्त मानवी भावना ‘जशाच्या तशा’ रोबोट व्यक्त करू शकत नाहीत, हे तितकंच खरं.

रोबोटचा विधायक वापर महत्त्वाचा :
या मर्यादांच्या कक्षेत रोबोटचा आजवर झालेला विकासही मानवासाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरतोय, हे नाकारता येणार नाही. मानवाच्या मनात नैसर्गिकपणे भावना येत असतात. त्यामुळे यंत्रमानवाला आपले सहकारी म्हणून निवडायचे झाल्यास त्यांच्यात आणि आपल्यात काही साम्य असावे, अशी आपली अपेक्षा असणार. मानवी रोबो म्हणजे मानवाप्रमाणे दिसणारे, हालचाल करू शकणारे, निर्णय घेण्याची क्षमता असलेले रोबो! अशा रोबोमध्ये असलेल्या सेन्सर्सच्या आधारे त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो, तर अॅक्चुएटर्सच्या साह्याने ते हालचाली करू शकतात. असे रोबो आणीबाणीच्या प्रसंगांत मानवासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. ते शाळेतील विद्यार्थ्यांशी छान संवाद साधू शकतात. हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि विशेष मुलांशीही संवाद साधू शकतात. आरोग्यसेवेसाठी विकसित केलेले मानवी रोबो डॉक्टर आणि रुग्णांना उपचारादरम्यान मदत करत आहेत. फक्त आरोग्यच नव्हे, तर मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात रोबोटचा, एआय तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करता येऊ शकतो. किंबहुना त्याची सुरूवात केव्हाच झाली आहे.

मतमतांतरे अन् अनिश्चितता :
या विधायकतेला दुसरी एक बाजू आहे, तीही दुर्लक्षून चालणार नाही. हिरोशिमा आणि नागासाकीचा विद्ध्वंस पाहिल्यावर अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने, आपण हा शोधच लावला नसता तर किती बरे झाले असते, असे उद्गार काढले होते. यंत्रमानवाला मानवी बुद्धिमत्ता दिली गेली, तर ते आपल्याला अपेक्षित कामे करतीलच, शिवाय आपल्याला नको असलेली कामेही करू शकतील, हे स्पष्ट आहे. म्हणूनच ‘एआय’बाबत सध्या चालू असलेलं संशोधन रोखलं पाहिजे, असे ठामपणे सांगणारा संशोधकांचा एक गट आहे. तर, मानवी बुद्धीची झेप म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, त्याचा मानवी जीवनाला कसलाच धोका नाही, असे सांगणारा दुसरा गट आहे. अर्थात त्यातून पुढे नेमके काय होईल, याविषयी आज तरी कोणीही छातीठोकपणे भाकीत करू शकत नाही.
सध्या स्मार्टफोन, संगणक या साधनांमुळे व्यक्तींमधील संबंधांत दुरावा वाढला आहे. अशा यंत्रमानवांमुळे तो आणखी वाढेल. मानवी मेंदूची प्रचंड सर्जनशीलता आणि तर्क बांधण्याची क्षमताही इथे थिटी पडते आहे. त्यामुळे भविष्याच्या पोटातील हे ज्ञान अद्याप मानवी बुद्धिमत्तेसाठी अगम्यच आहे. तंत्रज्ञान विकासाच्या अव्याहतपणे सुरू असलेल्या या प्रक्रियेत जे आपल्यासमोर येतंय त्यावर डोळसपणे विचार करून, त्याच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करून ते स्वीकारणे आणि त्याचा वापर करताना सजग राहणे हा सध्या तरी तंत्रज्ञानाच्या वापरातील धोके टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हा मार्ग प्रत्येकाने अवलंबल्यास आपण झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर मानवाच्या भल्यासाठी करू शकू.

प्रतिक कोसके
pratikkoske@gmail.com



Source link