
महेंद्र कदम17 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
वेदपूर्व प्राचीन भारतीय आर्य आणि गण समाज दोन्हीही इहलोकवादी होते. त्यांचा इहलोकवाद नैसर्गिक आणि वास्तव जगण्याला महत्त्व देणारा होता. नंतरच्या काळात गणसमाज पराभूत होत जाताना वैदिक समाज सत्तेत आला आणि धर्माला अध्यात्माचे रूप आले. वर्चस्ववादी समाज नेहमीच आपल्या सोयीचे तत्त्वज्ञान जन्माला घालून शोषणाची व्यवस्था बळकट करत असतो. अशा वर्गीय हितसंबंधांमध्ये बौद्धिक कामाला महत्त्व येते, तर कष्टकरी समाज तुच्छ मानला जातो. कष्टकरी समाजावर सत्ता गाजवण्यासाठी नैसर्गिक धर्माचं आध्यात्मिक धर्मात रूपांतर करून तो शोषणाला जोडला जातो. भारतही याला अपवाद नाही.
रामायण- महाभारतातील कथा या राजकीय लढाई होत्या. हे ग्रंथ कित्येक वर्षे लिहिले जात होते. जय, भारत आणि महाभारत अशी तीन टप्प्यांत महाभारताची निर्मिती झाली आहे. त्यामुळे त्यातील युद्ध आणि गीता यांचा संबंध कसा जोडायचा, हा प्रश्न आहे. गीतेचं तत्त्वज्ञान लवचिक आहे. विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्या संघर्षात ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या सरमिसळीची कथा आहे. अशीच सरमिसळ वैश्य आणि शूद्रातही होत होती. त्यामुळे ज्यांच्या पायावर हिंदुत्वाची मांडणी केली जाते, ते मूळ हिंदुत्व सर्वांना सामावून घेणारं आहे. ज्यात वैदिक, गण, तंत्र, लोकायत, जैन, बौद्ध, सांख्य, शैव, शाक्त, वैष्णव, मुस्लिम, नाथ आदी अनेक संप्रदायांचा समावेश आहे. तो धर्मापेक्षा अधिक जीवनशैली म्हणून अस्तित्वात आहे. हीच हिंदू असण्याची खरी ओळख आहे.
द्वेषाने द्वेष आणि प्रेमाने प्रेम वाढते, असे सांगणाऱ्या बुद्ध, जैन जीवनशैलीने भारतात हजारेक वर्षे समतेची मांडणी केली आहे. मुस्लिम राजवटीत अनेक चांगल्या गोष्टी भारतात घडल्या. शाहीर अमर शेख यांच्या आई मुनेरबी यांच्या कविता बहिणाबाई चौधरींच्या कवितेइतक्या हिंदू आहेत. बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेचे संवाद राही मासूम रजा यांनी लिहिले आहेत. आपल्या एका कवितेत ते म्हणतात, ‘मेरा नाम मुसलमान जैसा है, कत्ल करो और मेरे घरमें आग लगा दो, लेकिन मेरी रग-रग में गंगा का पानी दौड रहा है.’ संगीत, चित्रपटाच्या क्षेत्रात या समाजाचं योगदान मोठं आहे. सुफी संतांपासून हमीद दलवाई, फ. ह. बेन्नूर, फ. म. शहाजिंदे, समर खडस, शफाअत खान, रफिक सूरज अशी मोठी परंपरा आपल्याकडे आहे. ती नीट समजावून घेतली पाहिजे.
धर्मांधता सगळ्याच धर्मात असते. एखाद्या धर्मातच ती आहे म्हणून द्वेष पसरवून चालणार नाही. त्यामुळे विशिष्ट रंगात भारताचे चित्र उभा करण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. वाळवंटी प्रदेशात वाढलेल्या मुस्लिम समाजाला हिरवळीच्या रूपानं दिसणारा हिरवा ओॲसिस जगण्याला प्रेरक वाटला म्हणून त्यांनी तो रंग स्वीकारला. आग ओकणारा सूर्य त्यांचा देव होऊ शकत नव्हता, म्हणून शीतल चंद्र स्वीकारला. या प्रतिमा त्यांनी भारतात आल्यावर विरोधी म्हणून स्वीकारल्या नाहीत. आपला पाच हजार वर्षांचा भारत द्वेषपूर्ण नाही. तो बहुसांस्कृतिक आहे. ही ओळख पुसून आपण महासत्ता होऊ शकणार नाही. ज्या कोल्हापुरात आरक्षणासह सामाजिक समतेचा जन्म झाला, तेथे दंगल होणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. समाजातील सर्वांमध्येच ‘आपला तो बाळ्या अन् लोकांचं ते कार्ट,’ ही प्रवृत्ती बळावली आहे. चुकीला चूक म्हणण्याची धमक कमी होत आहे. मला काय त्याचं? असं मानणारा वर्ग द्वेष पसरवणाऱ्या वर्गापेक्षा धोकादायक असतो. तुम्ही खऱ्याची चप्पलही घालायला तयार नाही, म्हणून खोटं गावभर हिंडू लागलं आहे.
सोलापूरच्या माढा तालुक्यातील माझ्या वडशिंगेचे ग्रामदैवत रामसिद्धबुवा (पीर) आहे. त्याचा पुजारी मुस्लिम आहे. सगळं गाव या दैवताची यात्रा करतं. मोहरमचे डोले बसवायला गावातला सगळा बालचमू गोळा व्हायचा. गाव तो उत्सव करायचा. लाखाच्या वर इनाम देणाऱ्या कुस्त्याच्या फडाची सुरुवात शंकर गोसावी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने होते. हा सलोखा हरवून आपण काय मिळवणार आहोत? ते गाव मला पुन्हा खुणावतं आहे. त्या गावात आजही खोटं चप्पल घालून फिरत नाही. खऱ्याचा हा धाक वाढायला हवा.
संपर्क : ९०११२०७०१४
mahendrakadam27@gmail.com






