‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ बाबासाहेबांचा आदर्श तरुणांनी आत्मसात करावा — बजरंग गायकवाड
हणमंतवाडी, ता. फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील पहिले पुष्प हणमंतवाडी येथे गुंफण्यात आले. ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकताना आयु. बजरंग गायकवाड यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल आणि गरिबीच्या परिस्थितीतही शिक्षणाची कास सोडली नाही. वडील रामजी बाबा यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. आर्थिक अडचणींवर मात करून बाबासाहेबांनी ज्ञानार्जनाचा ध्यास कायम ठेवला.
कोलंबिया विद्यापीठातील बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांची विद्वत्ता आणि ज्ञानाची भूक विलक्षण होती. आजच्या तरुणांनी मोबाईलच्या आहारी न जाता बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी आणि शिक्षणाला जीवनातील सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानसंपदेचा आणि जागतिक स्तरावरील कार्याचा गौरव करताना गायकवाड सरांनी बाबासाहेबांचे विचार हे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवमुक्तीचा मार्ग दाखवणारे असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष यांच्या सूत्रसंचालनातून झाली. त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण आणि भीमस्तुती घेऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित सुंदर गीत सादर केले. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार सचिव आयु. अमोल भोसले सर, भीमज्योत तरुण मंडळाचे कार्यकर्ते आयु. संजय धाईंजे सर, झेंडे सर, पांडुरंग धांईजे सर तसेच महिला, पुरुष आणि बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
समारोपप्रसंगी आयु. महावीर भालेराव यांनी ‘सांगा भीमाला मी का विसरावे’ हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शेवटी झेंडे सर यांनी आभार मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान, संघर्ष आणि शैक्षणिक विचारांचा जागर करणारे हे वर्षावास प्रवचन हणमंतवाडी परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरले.
