
फलटण प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांना संधी देऊन त्यांच्या दीर्घकालीन राजकीय कार्याचा सन्मान राखावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे.
राजघराण्याची पार्श्वभूमी लाभलेले संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रभावी आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षे तळागाळातील प्रश्नांवर काम करत सामान्य नागरिकांशी घट्ट नाते निर्माण केले आहे. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची प्रतिमा असून त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला निश्चितच होऊ शकतो, असे मत शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ एप्रिल २०२६ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून ३० एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. २ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून ४ मे ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. संबंधित ९ आमदारांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.
राजकीय समीकरणांनुसार या ९ जागांपैकी सुमारे ५ जागा भाजपला, २ जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, १ जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी एक जागा संजीवराजे नाईक निंबाळकर यांना द्यावी, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. पक्ष नेतृत्व या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







