शिखर शिंगणापूर यात्रा: इतिहास, परंपरा आणि भक्तीचा अद्वितीय सोहळा

0
10
शिखर शिंगणापूर यात्रा: इतिहास, परंपरा आणि भक्तीचा अद्वितीय सोहळा


फलटण प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यातील माण (दहिवडी) तालुक्यात वसलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे गाव शंभू महादेव मंदिरामुळे विशेष प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे हे खाजगी देवस्थान मानले जाते. इतिहासात नमूद केल्याप्रमाणे, दोन्ही छत्रपतींनी मंदिराला दान देऊन त्याची देखभाल केली होती.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पवित्र स्थान
दहिवडी पासून सुमारे २० किमी अंतरावर आणि फलटण च्या आग्नेयेस वसलेले शिखर शिंगणापूर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे. शंभू महादेव डोंगरावर वसलेले हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे १,०५० मीटर उंचीवर आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ४०० पायऱ्या चढाव्या लागतात, ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक अनुभवासोबत निसर्गसौंदर्याचाही आनंद मिळतो.
मंदिराची वैशिष्ट्ये
मंदिराच्या गाभाऱ्यात दोन शिवलिंगे असून ती शिव-पार्वतीचे प्रतीक मानली जातात. मंदिरात मोठ्या घंटा आहेत, त्यापैकी एक ब्रिटिशकालीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराचे शिखर सूक्ष्म नक्षीकामाने सजलेले असून स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. परिसरात दीपमाळा असून पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे.
ऐतिहासिक वारसा
शिखर शिंगणापूर हे यादव वंशातील सिंघणदेव महाराजांनी वसवले असल्याची परंपरा आहे. मालोजीराजे भोसले यांनी इ.स. १६०० मध्ये ‘पुष्करतीर्थ’ (सध्याचे शिवतीर्थ) बांधले. पुढे शाहू महाराज यांनी १७३५ मध्ये मंदिराचे पुनर्बांधकाम केले. मंदिराचा १९७८ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला.
चैत्र यात्रा आणि विवाह सोहळा
शिखर शिंगणापूरची प्रसिद्ध यात्रा गुढी पाडवा पासून चैत्र पौर्णिमा पर्यंत भरते. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर-पार्वती विवाह सोहळा हा यात्रेचा मुख्य आकर्षण असतो. यासाठी ५५० फूट लांबीचे पागोटे विणले जाते आणि ते महादेव व अमृतेश्वर मंदिरांच्या कळसांना बांधले जाते. मध्यरात्री मंगलाष्टकांच्या गजरात हा विवाह सोहळा पार पडतो.
मुंगी घाट कावड सोहळा – भक्तीची पराकाष्ठा
चैत्र शुद्ध द्वादशीला मुंगी घाटातून कावड आणण्याची परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. सर्वात मोठी कावड ‘भुत्या तेल्याची’ मानली जाते. कठीण घाट चढताना भक्त “माहाद्या धाव” अशी हाक देत महादेवाला साद घालतात. कोणताही दोर न वापरता मानवी साखळीच्या सहाय्याने कावड वर नेली जाते. शेवटी पवित्र कऱ्हा संगमाचे पाणी अर्पण करून महादेवाचा अभिषेक केला जातो आणि यात्रेची सांगता होते.
निसर्ग, श्रद्धा आणि परंपरेचा संगम
शिखर शिंगणापूर हे केवळ धार्मिक स्थळ नसून निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळेही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून हजारो भाविक येथे दरवर्षी भेट देतात.