संघर्ष म्हटलं की आपल्याला साधारणपणे भांडण तंटा असंच वाटतं. वास्तविक विचार केला तर ते तसं नसतं. संघर्षाचा केवळ भांडण किंवा वाद आणि विवाद इतकाच संकुचित अर्थ नाही. संघर्ष एक व्यापक व्यक्तिगत आणि सामाजिक क्रिया आहे. संघर्ष कारण आणि निवारण याचा विस्तृतपणे विचार अनेक विचारवंतांनी केला. त्यात न्यायोचित संघर्ष हा विधायक स्वरूपाचा ही मानला गेला आहे. म्हणून संघर्ष हा सतत अनैतिक आणि विध्वंसत्मकच असतो असे नव्हे. संघर्ष ही मानवाच्या परस्पर संबंधांमध्ये सतत कार्यरत असणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये परस्परांमध्ये सहकार्य नसते किंवा ते तटस्थ ही नसतात त्या वेळेसच परस्पर संघर्षाची स्थिती उत्पन्न होत असते. ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार, ” दोन वर्ग किंवा समूहांच्या मध्ये सशस्त्र विरोध युद्ध लढाई किंवा विवाद यास संघर्ष म्हटले आहे “. संघर्ष करत असताना व्यक्ती किंवा समूह स्वतःच्या उद्देशांना प्राप्त करण्यासाठी विरोधकाच्या संबंधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिंसात्मक क्रिया प्रतिक्रियेचा प्रयोग करत असतो. वास्तविक पाहता संघर्ष हे परिवर्तनाचे एक प्रमुख साधन आहे. संघर्षाच्या सशक्त प्रक्रियेमध्ये उत्पन्न असंतोषाचे कारण आणि निमित्त समाप्त करून आवश्यक परिवर्तनाच्या दिशेने सामाजिक चेतना निर्माण करून उत्कृष्ट सिद्धांताचा परिचय दिला जातो. या प्रकारे क्रियांवीत संघर्षाची मात्र एक विशिष्ट छाप निर्माण होते. मानवाच्या इच्छेला टाळता येत नाही म्हणून संघर्ष आवश्यक होऊन जातो. आणि जगाच्या पाठीवर ही त्याच जीव जाती अस्तित्वात राहिल्या आहेत ज्या की संघर्ष प्रिय होत्या. घटनाकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे मूल्यवान तत्व म्हणजे शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा हेच. म्हणून न्यायोचित मागण्या आणि जन्मसिद्ध अधिकार प्राप्त होत नसतील तर संघर्ष हेच एकमेव नैतिक शस्त्र उरते. ज्यावेळी संघर्ष विधायक स्वरूपात केला जातो त्यावेळी त्याचा उद्देश न्यायाची प्राप्ती आणि आपले हक्क मिळवणे व त्याचा प्रतिस्पर्ध्यांना आग्रह करणे यासाठी असतो. म्हणून न्यायोचित हक्कासाठी केलेला संघर्ष हा नक्कीच नैतिक, सकारात्मक आणि उन्नतीसाठीच असतो. संघर्ष एकाच प्रकारचा नसून अनेक प्रकारचा असतो. व्यक्तीच्या मनात द्विधा परिस्थितीमध्ये द्वंद्व निर्माण होते. अनेक वैयक्तिक इच्छा आकांक्षा दमित होतात. याचेच कुंठित होण्यामध्ये रूपांतर होते. आणि ही कुंठा सहनशक्तीच्या बाहेर गेल्यानंतर याचेच संघर्षात आणि हिंसेत रूपांतर होते. मनुष्य आणि इतर जीवांमध्ये कधीकधी काही जाती प्रजाती दुसऱ्या जाती वरती शासन करण्याचा स्वतःला जन्मसिद्ध अधिकार समजतात. याच्याच परिणाम स्वरूप अन्य प्रजातींमध्ये यांच्याविरुद्ध संघर्ष भावना उत्पन्न होते. प्रजातीय संघर्षाचे प्रगती हे प्रमुख कारण आहे तर याशिवाय राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिक क्षेत्रांमध्ये जाती जातींमध्ये विषमता दिसून येते; त्याच्याही परिणाम स्वरूप परस्पर संघर्षाची बीजे रोवली जातात. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स यांनी म्हटले होते, ” मानवी समाज सदैव दोन आर्थिक वर्गामध्ये विभागलेला असेल शोषक आणि शोषित. हे दोन्ही वर्ग सतत एकमेकांशी संघर्षरत असतील तोपर्यंत जोपर्यंत की वर्ग विहीन समाजाची स्थापना होणार नाही.” प्राचीन काळापासूनच मानव जातीमध्ये वर्ग संघर्ष पाहायला मिळतो. मालक नोकर, भांडवलदार आणि कामगार, याप्रकारे अनेक वर्गांमध्ये सतत संघर्ष दिसून येतो जो की आजही विद्यमान आहे. व्यक्तिगत संघर्ष, प्रजातीय संघर्ष, वर्ग संघर्ष, जातीय संघर्ष आणि राजनैतिक संघर्ष यापेक्षाही संघर्ष उत्पन्न होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विषमता आणि अन्याय हेच आहे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक क्षेत्रांमध्ये सतत शक्तिशाली कडून शक्ती हीनांवरती होणारा अन्याय संघर्षाच्या प्रक्रियेला जन्म देत असतो. या अन्यायाचे सातत्यच प्रतिशोध व विवादांना जन्म देतात. यामुळेच व्यक्ती समाज व राष्ट्र सतत संघर्षरत होत असते. सामाजिक पातळीवर सुद्धा संघर्ष हा काही विशिष्ट परिणामांच्या प्राप्तीचे साधन आहे. संघर्ष विहीन समाजाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सामाजिक जीवनातून देखील आम्ही संघर्षाला वेगळं करू शकत नाहीत. नैतिक आणि विधायक संघर्षाच्या समाप्तीचा अंतिम परिणाम हा शांतीस्वरूपच असतो. संघर्षाचा मूळ आधार आणि कारण मात्र व्यक्तीच्या अनंत इच्छा लोभ या प्रवृत्तीच आहेत. इच्छेचा विस्तार हा अनेक प्रकारच्या हिंसेचे मूळ कारण असतो. इच्छापूर्तीसाठी दुसऱ्यांचे शोषण होते. उपार्जित पदार्थांच्या संरक्षणासाठी शस्त्रीकरण होते. या शस्त्रीकरणाचा अखेर युद्धाला जन्म देण्यात परिणाम होतो. म्हणून संघर्ष जसे उत्कर्षाचे उन्नतीचे परिवर्तनाचे साधन आहे तसेच अन्याय आधारित उद्देश असेल तर मात्र त्यासाठी केलेला संघर्ष हा हिंसेला जन्म देतो आणि त्यातून अशांतीच निर्माण होते. वर्णभेद, वर्गभेद, विषमता, उच्च नीच मानण्याची प्रवृत्ती, अतिलोभ, अधिकार व सत्तेचा विस्तार यासारख्या तत्त्वांमुळे सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावर संघर्ष निर्माण होतो आणि त्याचे मोठ्या प्रमाणात युद्ध आणि हिंसेमध्ये रूपांतर होते. वैयक्तिक किंवा दोन व्यक्ती मध्ये किंवा व्यक्ती व्यक्तींमध्ये मात्र राग, द्वेष, लोभ, आसक्ती, क्रोध, मान, माया, लोभ, वासना, विकार भाव, विकृती, लालसा, संग्रह वृत्ती… अशा अनेक प्रवृत्तींमुळे एक प्रकारची अशांतता निर्माण होऊन त्यांच्यात परस्पर संघर्ष निर्माण होतो. मात्र त्याचा परिणाम हिंसा आणि अशांती हाच असतो. म्हणूनच आज या ठिकाणी असे सांगावेसे वाटते की संघर्ष हा उन्नतीचे आणि परिवर्तनाचे मूळ कारण आहे परंतु तेव्हाच जेव्हा तो न्यायोचित मागणीसाठी आणि नैतिक आणि पवित्र उद्देशाच्या प्राप्तीसाठी नैतिक व अहिंसक मार्गाने केला जातो. हाच संघर्ष सकारात्मक असतो. (बलराज संघई, 9420015108 | वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर)
Source link







