हलकंफुलकं: तुकड्यात बुडेल जग…

0
13
हलकंफुलकं: तुकड्यात बुडेल जग…


संजय कळमकर10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पृथ्वीवर प्रत्येकाच्या हाती आलेल्या ‘त्या’ तुकड्याची करामत ऐकल्यावर देवेंद्र ब्रह्मदेवांना म्हणाले, ‘प्रगतीच्या नादात आपण दिलेल्या घालून नियमांचे मनुष्य उल्लंघन करतो आहे. आता तर तो अवकाशात पोहचला आहे. काही दिवसांनी मनुष्य सदेह स्वर्गात पोहचेल, अशी भीती वाटू लागली आहे. त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. मानवाचा आत्ताच बंदोबस्त करा. न पेक्षा सरळ जगबुडी करून टाका..!’

देवेद्रांनी ब्रह्मदेवाला विचारले, ‘पृथ्वीवर निर्माण केलेल्या मानवाला तुम्ही प्रगतीचे वरदान दिले. त्याला मुखपोकळी देवून त्यातून भाषा निर्माण होईल अशी सोय केली. बोलल्यामुळे माणसे एकमेकांचे विचार समजावून घेवू लागले. त्यातून त्यांचा सुसंवाद घडून माणूस माणसाच्या जवळ आला. त्यातून मानवजातीचा विकास झाला. परंतु, आजकाल आम्ही पाहतो, माणसे माणसांशी बोलतच नाहीत. कुठला तरी चपटा तुकडा खेळत बसतात. भाषा आखूड झाल्याने माणसांमधला सहसंबंध हरवत चालला आहे. बंधुभावाचे रुपांतर विसंवादात होवू लागले आहे. त्या चपट्या तुकड्यात अशी काय जादू आहे की माणूस त्यात हरवून मुका झाला आहे. स्वत:लाही विसरत चालला आहे..?’ यावर ब्रह्मदेव विषादाने म्हणाले, ‘त्या चपट्या तुकड्याला मोबाइल असे म्हणतात महाराज. तो मानवी बुद्धीचा आविष्कार आहे. पृथ्वीवर काही माणसे अक्कल वापरून काही साधने तयार करतात आणि बाकीची माणसे त्या साधनात आपली सारी अक्कल हरवून बसतात. त्या चपट्या तुकड्याने माणसे मुकी होवून आभासी जगात जगू लागली आहेत.’ देवेद्रांनी विचारले, ‘त्यात एवढे आहे तरी काय?’ ब्रह्मदेव उत्तरले, ‘काय नाही ते विचारा महाराज! सांगायचंच झालं, तर त्यात ट्विटर नावाचा एक प्रकार आहे. बहुतेक थोर, बुद्धिजीवी माणसे त्याचा वापर करतात. काही मोठ्या लोकांना असे वाटले की, समाजाचे, मीडियाचे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे, तर ते हेतुपुरस्पर काहीतरी खळबळजनक ट्विट करतात. त्यावरून वादळ उठते आणि ती थोर व्यक्ती अजून हयात असल्याचे सर्वांना समजते. काही ट्विटने मात्र चांगले संदेश जातात आणि समस्याही सुटतात. अनेक शहाणी माणसे यावर रोज टिटवीसारखी टीवटीव करत असतात. या ट्विटर नावाच्या प्रांतात टाइमपास करणाऱ्या लोकांची संख्या व्हाट्स अॅप, फेसबुकपेक्षा कमी असते. फेसबुकची तर वेगळीच गंमत आहे. गल्लीत मित्र नसलेला माणूसही यावर पाच हजार मित्र जोडू शकतो. यावर काही माणसे खरे रूप लपवून आपली खोटी प्रतिमा तयार करतात. एखादा सुंदर चेहरा स्वतःचा म्हणून दाखवतात. त्यामुळे त्याला फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात. त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर मात्र शुद्ध हरपायची वेळ येते. यावर बहुतेक लोक आपले वाढदिवस जोरात साजरे करून घेतात. पूर्वी काही कर्तृत्व असलेल्या लोकांचेच वाढदिवस व्हायचे. आता सरसकट साऱ्यांचेच वाढदिवस कम्पलसरी साजरे होतात. लोक गुंड, समाजकंटकांनाही भरपूर शुभेच्छा देतात. काही लोकांना तर फेसबुक म्हणजे आपल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक विचारांच्या प्रसारासाठी निर्माण झालेला दैवी चमत्कारच वाटतो. पण, त्यामुळे समाजात कलह निर्माण होवू शकतो. कायम चॅटिंगची सवय असलेली दोन माणसे प्रत्यक्ष भेटली तरी बावरून जातात. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत त्यांच्यात राहत नाही. फेसबुकच्या माध्यमाने दोन संसार उभे राहिले तरी चार मोडलेही आहेत. अनेकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. अर्थात हे माध्यम विवेकाने वापरले तर त्याचे अनेक फायदे आहेत, पण माणसाला टरबूजाबरोबर बिया गिळण्याची वाईट सवय आहे. त्याला आपण काय करणार?’

यापेक्षा व्हाट्स अ‌ॅप हा प्रकार माणसात फारच लोकप्रिय आहे, याकडे लक्ष वेधून ब्रह्मदेव म्हणाले, ‘लोकलच्या डब्यासारखी व्हाट्स अ‌ॅपवर माणसांची गर्दी असते, तेवढाच कोलाहलही असतो. प्रत्येकाची व्यक्त होण्याची नुसती धांदल उडालेली असते. माणसे रात्री-बेरात्री, मनात येईल तेव्हा काहीही आणि कसेही व्यक्त होतात. ग्रुपचे नाव, डीपी आणि स्टेटसवरून ज्या-त्या माणसाची एकंदर योग्यता लक्षात येते. काही माणसे रोज स्वतःचे वेगवेगळे फोटो डीपीवर लावतात. ती अखंड स्वतःच्या प्रेमात बुडालेली आहेत, असे समजावे. रोज डीपी बदलणारी माणसे चंचल स्वभावाची, विनोद टाकणारे आनंदी, नकारात्मक पोस्ट टाकणारे दु:खी, प्रत्येकाच्या पोस्टला आडवे चालणारे अडेलतट्टू, कायम अपघात, घातपात आणि अशाच अप्रिय बातम्या टाकणारे असमाधानी, वाद घालणारे भांडकुदळ, इतरांच्या पोस्टला प्रतिक्रिया न देणारे स्वमग्न, कुणाच्या तरी लांबलचक पोस्ट फोरवर्ड करून, पोस्टमनगिरी करणारे परावलंबी; कविता, लघुकथा टाकणारे रसिक किंवा नवकवी, कायम व्हाट्स अ‌ॅ​​​​​​​पवर मुक्कामी असणारे अस्वस्थ मनोवृत्तीचे… थोडक्यात काय, तर सार्वजनिक नळाप्रमाणे व्हाट्स अ‌ॅ​​​​​​​पवर अशी गर्दी जमून ती अविरत कलकल करीत असते. काहींचे अख्खे आयुष्य व्हाट्स अ‌ॅ​​​​​​​पमय झाले असून, हा छंद आता आजारात बदलत चालला आहे, महाराज.. अर्थात योग्य वापर केला तर व्हाट्स अ‌ॅ​​​​​​​पही उत्तम माध्यम ठरू शकते. ठरवले तर, चांगल्या कामाला निधी जमा होतो, हरवलेल्या व्यक्ती सापडतात, एकमेकांशी सुसंवाद घडतो, नातलग सुरक्षित अंतरावरून का होईना, परस्परांशी जोडून राहतात. इन्स्टाग्रामवर तर रील नावाच्या छोट्या व्हिडिओंनी निव्वळ धुमाकूळ घातला आहे. यावर पोरं-पोरी स्वतःचीच लग्न जमवतात आणि पळून जातात.’ ‘यापेक्षा गुगल आणि यूट्युब हे प्रकार म्हणजे अलीबाबाची गुहाच! गुगलवर पाहिजे ती माहिती मिळते. जणू आपल्या स्वर्गातला कल्पवृक्षच!’ असे सांगून ब्रह्मदेव अधिक माहिती देऊ लागले.. ‘यूट्युब आणखी वेगळं आहे. माणसं त्यावर स्वतः केलेल्या करामती टाकतात, त्या जगाला माहीत होतात. यूट्युबमुळे उपेक्षित कलाकारांना चांगले दिवस आले आहेत. परंतु, मनावर नियंत्रण नसलेली माणसं यावर हरवून जातात आणि नको ते पाहत बसतात. त्याचा वाईट परिणाम कोवळ्या मुलांवरही होतो. परिणामी समाजात काही अघटित प्रकार घडू लागले आहेत. काही मुलांची गेमच्या आहारी जावून वाताहत झाली आहे. काही मुला-मुलींनी तर गेममध्ये सांगितलं म्हणून आत्महत्या केल्या. माणसाच्या अन्न, वस्र, निवारा या गरजा बदलून आता त्या टीव्ही, मोबाइल, इंटरनेट अशा झाल्या आहेत. पृथ्वीवर प्रत्येकाच्या हाती आलेल्या ‘त्या’ तुकड्याची करामत ऐकल्यावर देवेंद्र ब्रह्मदेवांना म्हणाले, ‘प्रगतीच्या नादात आपण दिलेल्या घालून नियमांचे मनुष्य उल्लंघन करतो आहे. आता तर तो अवकाशात पोहचला आहे. वेगवेगळ्या ग्रहांजवळ घिरट्या घालतो आहे. काही दिवसांनी मनुष्य सदेह स्वर्गात पोहचेल, अशी भीती वाटू लागली आहे. त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. मानवाचा आत्ताच बंदोबस्त करा. न पेक्षा सरळ जगबुडी करून टाका..!’ यावर ब्रह्मदेव हसत म्हणाले, ‘निर्माण करतो त्याच्याजवळ विनाशाचे शस्रही तयार असते, महाराज. हे जग आकाराला यायला कित्येक युगे गेली. आता ते असेच सावकाशपणे संपेल. आपण जगबुडी करायची गरज नाही. नवीन जग निर्माण करण्याच्या नादात माणूस स्वतःचे जग आपोआप बुडवू लागला आहे. एक दिवस इंटरनेट सेवा बंद राहिली, तर आताच कोट्यवधी लोक अस्वस्थ होतात. ते आणखी बंद राहिलं तर भविष्यात हे लोक वेडेपिसे होतील, कित्येक धाय मोकलून रडतील, अनेकांचं जगणं नीरस होईल, त्यांना असलं आयुष्य नकोसं वाटू लागेल.. आता तर कृत्रिम प्रज्ञा आणि चॅट जीपीटीसारख्या गोष्टींतून माणसाने आपले अस्तित्व धोक्यात आणणारे पुढचे पाऊल टाकले आहे. आपण निश्चिंत असावे, महाराज. येतो आम्ही..’ देवेंद्र हळू आवाजात म्हणाले, ‘थांबा! तेवढे यमाला सांगून पृथ्वीवरून आमच्यासाठी एखादा मोबाइल उपलब्ध करा.. त्या चपट्या तुकड्याविषयी आम्हाला भलतेच आकर्षण निर्माण झाले आहे..’ देवेंद्रांसमोर तोंडदेखलं ‘हो’ म्हणत ब्रह्मदेव मनाशी पुटपुटले, ‘…म्हणजे स्वर्गाचा विनाशही समीपच आहे म्हणायचा..!’

संपर्क : ८८८८२२९९४४

sanjaykalamkar009@gmail.com



Source link