सातारा : वणव्यांमुळे डोंगरांची होतेय राखरांगोळी | पुढारी

0
21


तळमावले; पुढारी वृत्तसेवा :  डोंगरांना लावण्यात येणार्‍या वणव्यांमुळे डोंगरांची राखरांगोळी होत आहे. पाटण तालुक्यात डोंगरांना वणवे लागण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. बामणवाडी, शिद्रुकवाडी येथील परिसरातील डोंगरांना वणवे लागल्यामुळे येथील वनसंपदा जळून खाक होत आहे. तर या वणव्याची झळ वन्यप्राण्यांसह पशुपक्षांनाही बसत आहे.

पाटण तालुक्याला निसर्गाचा अनमोल ठेवा मिळाला आहे. घनदाट झाडी तसेच डोंगर दर्‍यांचा परिसर त्यामुळे वनसंपदा आणि औषधी वनस्पती येथे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे निसर्गाने आणि वनसंपदेने समृद्ध तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. मात्र, आता ही ओळख नामशेष होती की काय अशी भिती निर्माण झाली आहे. कारण येथे उन्हाळ्यात डोंगरांना सर्रासपणे वणवे लावले जात आहेत. वनविभाग वणवे रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शिद्रुकवाडी (खळे), व बागलवाडी (काढणे) परिसरातील डोंगराला व कुंभारगाव विभागातील बामणवाडी परिसरातील डोंगरांना लावलेल्या वणव्यामुळे वनविभागाच्या हद्दीतील वनसंपदा जळून खाक झाली आहे. ही आग आटोक्यात न आल्यामुळे शेतकर्‍यांच्या हद्दीत तो वणवा घुसण्याची भिती शेतकर्‍यांना वाटत होती. वणव्यामुळे कितीतरी सुक्ष्म जीव, सरपटणारे प्राणी, पक्षी, तसेच इतर वन्यजीव जळून खाक होत आहेत.

दुर्मीळ वनस्पती, वृक्ष जळून खाक…

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वणव्यांचे सत्र सुरू असते. यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. मात्र, वनविभागाने यातून कोणताही धडा घेतलेला नाही. अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात डोंगरांना वणवे लावले जात आहेत. या वणव्यांमध्ये दुर्मीळ वनस्पती, वृक्ष जळून खाक होत आहेत. तसेच याची झळ वन्यप्राण्यांसह पशुपक्षांना बसत आहे. याचा विचार करून वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

The post सातारा : वणव्यांमुळे डोंगरांची होतेय राखरांगोळी appeared first on पुढारी.



Source link